आंबी – शेतीच्या बांधावरून झालेल्या वादातून एका ६५ वर्षीय व्यक्तीला व त्यांच्या पत्नीला मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कारंडी-चिंचपूर रोडवर घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी रामदास बाबुराव गुंजाळ (वय ६५ वर्षे, रा. कारंडी, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबानुसार, २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते कारंडी-चिंचपूर रोडवर असताना आरोपी मारुती धोंडीबा वरळे आणि गंगुबाई मारुती वरळे (दोघे रा. ढगे चिंचपूर, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी त्यांना बांध टोकरण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले.
यावेळी फिर्यादी गुंजाळ यांच्या पत्नी संगीता या भांडण सोडवण्यासाठी आल्या असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून ढकलून दिले व दोघांनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी रामदास गुंजाळ यांनी १५ मे २०२५ रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाब व तक्रारीवरून आंबी पोलीस ठाण्यात मारुती वरळे आणि गंगुबाई वरळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) (जीवे मारण्याची धमकी), ११५(२) (शिवीगाळ), ३५१(२) (धक्का मारणे), ३५१(३) (मारहाण करणे) आणि ३(५) (इतर संबंधित गुन्हे) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.