मुंबई/धाराशिव: श्री तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार आढावा बैठकीच्या अवघ्या काही तास आधी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. आधी वगळल्यानंतर समावेश करण्यात आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची नावे बैठकीच्या निमंत्रितांच्या यादीतून पुन्हा एकदा वगळण्यात आली आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुन्हा एकदा राजकीय डाव साधल्याची चर्चा या नाट्यमय घडामोडीनंतर सुरू झाली आहे.
सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी मुंबईत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. सुरुवातीला या बैठकीतून पालकमंत्री आणि खासदारांना वगळल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर, मंत्रालयाने अधिकृत पत्रक काढून दोघांचाही निमंत्रितांमध्ये समावेश केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, आता ऐन बैठकीच्या आदल्या दिवशी, या दोघांनाही पुन्हा वगळण्यात आल्याने महायुतीमधील संघर्ष किती टोकाला गेला आहे, हे स्पष्ट झाले आहे.
या शेवटच्या क्षणी झालेल्या बदलामुळे आमदार राणा पाटील यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर दबाव आणून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे मानले जात आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीतून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खासदार यांनाच दुसऱ्यांदा वगळण्याचा प्रकार अभूतपूर्व मानला जात आहे. या निर्णयामुळे आता उद्या होणाऱ्या बैठकीत काय होणार आणि त्याचे राजकीय पडसाद कसे उमटणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
नवीन पत्रकातील धक्कादायक बदल:
- बदललेली वेळ: पूर्वी सकाळी ११:३० वाजता होणारी ही बैठक आता सायंकाळी ४:३० वाजता होणार आहे.
- बदललेले ठिकाण: मंत्रालयाऐवजी आता ही बैठक मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरमधील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या समिती कक्षात होणार आहे.
- निमंत्रितांची छाटणी: सर्वात मोठा बदल निमंत्रितांच्या यादीत झाला आहे. या नवीन यादीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची नावे यादीतून पूर्णपणे गायब आहेत. यादीत आता केवळ आमदार पाटील, प्रशासकीय अधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि पुजारी यांचाच समावेश आहे.
या नवीन पत्रकामुळे, आधी पालकमंत्री आणि खासदारांना वगळणे, नंतर बातमीच्या दबावानंतर समावेश करणे आणि आता पुन्हा ऐनवेळी वगळणे, या सर्व राजकीय घडामोडींना अधिकृत दुजोरा मिळाला आहे. या बैठकीवर आमदार राणा पाटील यांनी पूर्णपणे राजकीय वर्चस्व मिळवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता उद्या सायंकाळी होणाऱ्या या बैठकीकडे आणि त्यानंतरच्या राजकीय प्रतिक्रियांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










