परंडा : शेतीच्या जुन्या वादातून एका महिलेला सहा जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना परंडा तालुक्यातील तांदुळवाडी येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आंबी पोलीस ठाण्यात चार महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्योती सोमनाथ खरसडे (वय ३२, रा. तांदुळवाडी, ता. परंडा) असे मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती खरसडे आणि आरोपी यांच्यात शेतीचा वाद आहे. शनिवारी (दि. १७ जानेवारी २०२६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास तांदुळवाडी शिवारात हा प्रकार घडला. आरोपी अर्चना सुधीर खरसडे, सुवर्णा हनुमंत खरसडे, राधिका मधुकर खरसडे, रुक्मिणी प्रल्हाद खरसडे, नवनाथ कल्याण खरसडे आणि हनुमंत कल्याण खरसडे (सर्व रा. तांदुळवाडी) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून ज्योती यांना गाठले.
शेतीच्या कारणावरून आरोपींनी ज्योती यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जखमी केले. यावेळी आरोपींनी ज्योती यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर ज्योती खरसडे यांनी शनिवारीच आंबी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील सहाही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२) (गैरकायद्याची मंडळी जमवणे), १९१(२) (दंगल करणे), १९०, ११५(२) (दुखापत करणे), ३५२ आणि ३५१(२)(३) (धमकी देणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आंबी पोलीस करत आहेत.






