धाराशिव : जिल्हा होमगार्ड कार्यालयात घुसून महिला होमगार्ड कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करत शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेला कथित तोतया पोलीस राम बोंदर अखेर धाराशिव शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत फरार राहिलेल्या बोंदरला अत्याधुनिक तांत्रिक तपास, लोकेशन ट्रॅकिंग आणि विशेष पथकाच्या नियोजनबद्ध कारवाईत अटक करण्यात आली. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या तपासाचे कौतुक केले जात आहे.
या कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी विशेष पथकाची स्थापना केली होती. आरोपी वारंवार ठिकाणे बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र तांत्रिक विश्लेषण, लोकेशन ट्रॅकिंग आणि गुप्त माहितीच्या आधारे अखेर आरोपीला अटक करण्यात यश आले.
या प्रकरणात महिला होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५(३), ७९, ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, होमगार्ड कार्यालयात सुरू असलेल्या मोहरम बंदोबस्त वाटपाच्या कामात आरोपीने हस्तक्षेप करून महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ केली तसेच धमकावल्याचा आरोप आहे.
दरम्यान, राम बोंदर याच्यावर काही दिवसांपूर्वी आनंदनगर पोलीस ठाण्यात एका खासगी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल झाला होता. तसेच यापूर्वी धाराशिवच्या आठवडे बाजारातील कथित लाच प्रकरणातही त्याचे नाव चर्चेत आले होते.
मात्र, आरोपीला अटक झाल्यानंतरही काही महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. होमगार्ड कार्यालयात घुसून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप असताना, भारतीय न्याय संहितेतील शासकीय कामात अडथळा आणण्यासंदर्भातील संबंधित कलमांनुसार स्वतंत्र गुन्हा दाखल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तपासादरम्यान आरोपीचा मोबाईल जप्त करून त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), संपर्क, लोकेशन हिस्ट्री आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी होण्याची शक्यता आहे. या तपासातून आरोपीचे नेमके संबंध कोणाशी होते, तो शासकीय कार्यालयात इतक्या सहजतेने कसा वावरत होता, त्याला कोणाचे संरक्षण होते का आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा उलगडा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सर्वसमावेशक चौकशी करून सर्व डिजिटल पुराव्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करावे, तसेच आवश्यक असल्यास संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तोतया पोलीस राम बोंदर गजाआड गेला असला तरी शासकीय कामात अडथळा, सरकारी कार्यालयातील अनधिकृत हस्तक्षेप आणि संभाव्य संगनमताच्या आरोपांबाबत पुढे कोणती कारवाई होते, याकडे आता संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




