काही लोक उगीच प्रश्न विचारतात…
वारी केल्याने देव भेटतो का?
वारीत पांडुरंग भेटतो का?
या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहण्याआधी एकदा वारीच्या वाटेकडे पाहा.
उत्तर आपोआप मिळेल.
देहू आणि आळंदीपासून पंढरपूरचा प्रवास जवळपास अडीचशे किलोमीटरचा.
वारकरी दररोज पंचवीस ते तीस किलोमीटर पायी चालतो.
ऊन आहे.
पाऊस आहे.
वारा आहे.
रस्त्यावरची धूळ आहे.
पण मुखी एकच गजर…
‘ज्ञानोबा माऊली… तुकाराम!’
चालून चालून पाय दुखतात.
टाचा ठणकतात.
पायांना भेगा पडतात.
फोड येतात.
शरीर थकून जाते.
रात्री मुक्कामाच्या ठिकाणी अंग टेकले की पुन्हा उठावेसे वाटणार नाही, इतका थकवा असतो.
पण आश्चर्य बघा…
दुसऱ्या दिवशी सकाळी हाच वारकरी पुन्हा ताजातवाना होऊन उभा राहतो.
गळ्यात टाळ अडकवतो.
हातात पताका घेतो.
आणि पुन्हा पंढरीच्या दिशेने चालू लागतो.
वारकऱ्यांमध्ये एक गोड समजूत आहे…
रात्री वारकरी झोपल्यानंतर विठ्ठल येतो आणि आपल्या भक्तांचे पाय दाबतो. म्हणून सकाळी वारकरी पुन्हा ताजातवाना होतो!
कुणाला ही श्रद्धा वाटेल.
कुणाला आख्यायिका वाटेल.
कुणी त्यावर हसेलही.
पण मला एक प्रश्न विचारायचा आहे…
वारीच्या मुक्कामात थकलेल्या वारकऱ्याचे पाय दाबणारे हात तुम्ही पाहिले आहेत का?
कुणी त्या वारकऱ्याला ओळखत नाही.
नाव माहीत नाही.
गाव माहीत नाही.
जात माहीत नाही.
तरी एक अनोळखी माणूस खाली बसतो आणि थकलेल्या वारकऱ्याचे पाय आपल्या हातात घेतो.
हळुवारपणे दाबतो.
अरे, तो पांडुरंग नव्हे तर काय?
वारीच्या मार्गावर डॉक्टर उभे आहेत.
फोड आलेल्या पायांवर औषध लावत आहेत.
जखमा स्वच्छ करत आहेत.
थकलेल्या वारकऱ्याची तपासणी करत आहेत.
‘माऊली, काळजी घ्या…’ असे प्रेमाने सांगत आहेत.
त्या डॉक्टरच्या रूपात पांडुरंग नाही का?
रस्त्यावर पोलीस उभा आहे.
लाखोंची गर्दी सांभाळतोय.
ऊन-पावसात कर्तव्य बजावतोय.
वारकरी सुरक्षितपणे पुढे जावा म्हणून वाहतूक थांबवतोय.
एखादा वृद्ध वारकरी मागे राहिला तर त्याला रस्ता करून देतोय.
त्या पोलिसाच्या वर्दीत पांडुरंग नाही का?
वारी पुण्यात येते.
आणि पुणे जणू आपले घर वारकऱ्यांसाठी उघडे करते.
कुणी पोहे देतो.
कुणी उपमा.
कुणी खिचडी.
कुणी भाकरी-भाजी.
कुणी चहा.
कुणी पाण्याची बाटली हातात देतो.
एक वारकरी पुढे जातो आणि त्याच्या सेवेसाठी हजारो हात पुढे येतात.
सेवा करणारा विचारत नाही—
तुम्ही कोण?
कुठल्या गावचे?
तुमची जात कोणती?
तुमचा पक्ष कोणता?
तो फक्त म्हणतो…
‘माऊली, प्रसाद घ्या!’
त्या दोन शब्दांत पांडुरंग भेटत नाही का?
कुठेतरी एखादी आई रस्त्याच्या कडेला पाण्याचा हंडा घेऊन बसलेली असते.
कुठेतरी तरुण मुलांचा समूह वारकऱ्यांना पाणी वाटत असतो.
कुणी चप्पल देतो.
कुणी रेनकोट देतो.
कुणी औषध देतो.
कुणी फक्त हात जोडून म्हणतो—
‘माऊली, राम कृष्ण हरी!’
मग मला सांगा…
पांडुरंग भेटण्यासाठी आणखी काय हवे?
आपण देवाला नेमके कुठे शोधतोय?
फक्त मंदिरात?
फक्त मूर्तीत?
फक्त गाभाऱ्यात?
वारी कदाचित आपल्याला देवाचा पत्ता सांगते.
थकलेल्याचे पाय दाबणाऱ्या हातात देव आहे.
भुकेल्याला अन्न देणाऱ्या माणसात देव आहे.
तहानलेल्याला पाणी देणाऱ्या हातात देव आहे.
जखमेवर औषध लावणाऱ्या डॉक्टरमध्ये देव आहे.
लाखो वारकऱ्यांची वाट सुरक्षित करणाऱ्या पोलिसात देव आहे.
आणि एवढे सगळे अनुभवूनही जो वारकरी नम्रपणे हात जोडून म्हणतो—
‘सगळं माझ्या पांडुरंगाची कृपा!’
त्या वारकऱ्यातही पांडुरंग आहे.
म्हणून पुन्हा कुणी विचारले—
‘वारीत पांडुरंग भेटतो का?’
तर त्याला एकच सांगा…
पंढरीच्या वाटेवर एक दिवस चालून बघ.
थकून बघ.
तहान लागून बघ.
पायाला फोड येऊ दे.
आणि मग अचानक तुझ्यासमोर पाण्याचा ग्लास घेऊन उभ्या राहिलेल्या अनोळखी माणसाच्या डोळ्यांत बघ…
तुला पांडुरंग नक्की भेटेल!
फक्त…
त्याला ओळखता आले पाहिजे.
— सुनील मधुकर ढेपे




