अणदूर (ता. तुळजापूर): ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजरात श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा मार्गच आता ‘मातीमोल’ ठरण्याची वेळ आली आहे. शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून तब्बल १ कोटी ६८ लाखांचा निधी मंजूर झालेल्या अणदूर येथील मुख्य रस्त्याचे काम म्हणजे विकासाचा आदर्श नव्हे, तर भ्रष्टाचाराचा आणि मनमानी कारभाराचा उत्तम नमुना बनले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, भाजप आमदार राणा पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणवणाऱ्या कंत्राटदारानेच या कामात ‘माती’ कालवली असून, या गंभीर प्रकारावर आमदार महोदयांनी धारण केलेले मौन त्यांच्या कथित ‘टक्केवारी’वर शिक्कामोर्तब करते की काय, असा संतप्त सवाल गावकरी विचारत आहेत.
विकासाचा निधी, कंत्राटदाराचा खिसा!
अणदूर बस स्थानक ते आण्णा चौक या केवळ चारशे मीटरच्या रस्त्यासाठी दीड कोटींहून अधिक निधी मंजूर झाला. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून हे काम कासवगतीने सुरू आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली दोन महिने काम बंद ठेवण्याचा फार्स झाला, पण अतिक्रमण इंचभरही हटले नाही. आता जे काम सुरू आहे, ते इतके निकृष्ट आहे की, अंदाजपत्रकात नमूद असलेल्या एम-३० दर्जाच्या काँक्रीटऐवजी सर्रासपणे मातीमिश्रित डस्ट वापरली जात असल्याच्या तक्रारींनी जोर धरला आहे. “पन्नास वर्षे टिकेल,” अशी ग्वाही दिलेला रस्ता पन्नास दिवसांतच भेगाळला असून, कामाच्या गुणवत्तेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
आमदार गप्प, कार्यकर्ता संतप्त!
हे काम आमदार राणा पाटील यांच्या एका कट्टर कार्यकर्त्याने दुसऱ्याच्या नावे मिळवले असल्याची गावात उघड चर्चा आहे. कामातील त्रुटींविषयी खुद्द आमदार राणा पाटील यांच्याकडे तक्रारी करूनही त्यांनी ‘मूग गिळून गप्प’ बसण्याची भूमिका घेतल्याने गावकऱ्यांच्या संतापात भर पडली आहे. आमदारांच्या या संशयास्पद शांततेमुळेच या भ्रष्ट कारभाराला त्यांचेच अभय आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर, भाजपच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल करून गावातील घुसमट चव्हाट्यावर आणली आहे. “अरे बाबांनो… जनाची नाही तर मनाची तर लाज ठेवा! तुम्हाला गावच्या विकासाचं नाही तर स्वत:चा खिसा भरायचंच पडलंय!” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
‘कोण तर म्हटलं… तुम्ही ऐकले नाही’
व्हायरल झालेल्या पोस्टमधून कामातील प्रत्येक टप्प्यावर झालेल्या चुकांचा पाढाच वाचण्यात आला आहे:
- चुकीचे नियोजन: “रस्त्याच्या कडेने गटारी करा, पाणीपुरवठा लाईन बाजूने टाका, म्हणजे दुरुस्तीला सोपे जाईल, असे गाव ओरडून सांगत होते, पण तुम्ही ऐकले नाही.” आज गावात अनेक ठिकाणी निकृष्ट पाईपलाईन फुटून रस्त्याचा सत्यानाश होत आहे.
- निकृष्ट दर्जा: “एम-३० काँक्रीट वापरा, रोलर फिरवा, असे वारंवार सांगूनही तुम्ही जावईशोध लावत बसलात. लोकांच्या दुकानांपुढे सोयीनुसार वाकडातिकडा कोबा करून ठेवलाय.”
- जनतेला अंधारात ठेवले: “निधी कोणी दिला, अंदाजपत्रक काय आहे, रस्ता कुठून कुठपर्यंत होणार, याची कोणतीही माहिती जनतेला न देता हा मनमानी कारभार कशासाठी?”
- निवडणुकीचा इशारा: “चार महिन्यांवर निवडणुका आहेत. गाव गप्प आहे म्हणजे गावाला कळत नाही असे समजू नका. भल्याभल्यांना वठणीवर आणलेलं हे अणदूर गाव आहे. मतपेटीचा दणका द्यायला गाव तयार आहे. सुधरा!”
एकंदरीत, तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा ‘धुळफेकीचा’ प्रकार आता गाव सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. भाविकांची गैरसोय, ग्रामस्थांना होणारा जीवघेणा त्रास आणि विकासाच्या निधीची चाललेली लूट याविरोधात गावामध्ये तीव्र असंतोष पसरला असून, येत्या निवडणुकीत या भ्रष्ट कारभाराचा हिशोब चुकता करण्यासाठी मतदार सज्ज झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.