अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजनेअंतर्गत झालेल्या २ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून गैरव्यवहार झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या रस्त्यावर अवघ्या दोन महिन्यांतच भेगा पडल्या असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आर. एस. गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अणदूर येथील बस स्थानक ते खंडोबा देवस्थानपर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून २ कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र, कंत्राटदाराने अंदाजपत्रकाचे पालन न करता अत्यंत निकृष्ट पद्धतीने काम केले आहे.
निवेदनातील प्रमुख आरोप:
- रस्त्याच्या कामाला दोन महिने पूर्ण होताच त्यावर भेगा (चिरा) पडल्या आहेत.
- कामामध्ये धुळीचा (डस्ट) मोठ्या प्रमाणात वापर केल्याने कामाचा दर्जा खालावला आहे.
- रस्त्यावर रोलरने योग्य दाब दिलेला नाही आणि रस्त्याची रुंदी अनेक ठिकाणी कमी-जास्त ठेवण्यात आली आहे.
- या निकृष्ट कामामुळे शासनाचा २ कोटी रुपयांचा निधी वाया जात आहे.
या सर्व त्रुटींमुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असून, या रस्त्याच्या कामाची राज्य गुणवत्ता निरीक्षकांमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. तसेच, या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.