मुरुम – उमरगा तालुक्यातील बेळंब तांडा येथे जुन्या भांडणाच्या रागातून एका कुटुंबातील सात जणांनी मिळून दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये कुऱ्हाड, दगड आणि दांडक्याने मारहाण करण्यात आली असून, फिर्यादीसह त्याचे भांडण सोडवण्यासाठी आलेले कुटुंबीयही जखमी झाले आहेत. ही घटना २५ एप्रिल २०२५ रोजी पहाटे घडली असून, मुरुम पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी मानू राठोड (वय ५० वर्षे, रा. बेळंब तांडा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २५ एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपी गोपीनाथ हिरू राठोड, पवन गोपीनाथ राठोड, प्रवीण गोपीनाथ राठोड, बबलू उर्फ रोहित राजू चव्हाण, राजू डालू चव्हाण, शानाबाई गोपीनाथ राठोड, आणि जनाबाई राजू चव्हाण (सर्व रा. बेळंब तांडा) यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून गैरकायदेशीर जमाव जमवला.
आरोपींनी फिर्यादी शिवाजी राठोड यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, कुऱ्हाड, दगड आणि दांड्याने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादीची पत्नी, सून, मुलगा आणि पुतणी हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले. यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली.
शिवाजी राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुरुम पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(२), ११८(१), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९०, १९१(२)(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.