भूम – शहरातील कुसुम नगरमधील एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातील ८ लाख ८४ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही धाडसी चोरीची घटना रविवारी, १५ जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील खुशी कॉम्प्लेक्स, कुसुम नगर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. १५ जून रोजी पहाटे २.२० ते ३.०० वाजण्याच्या सुमारास, अज्ञात व्यक्तींनी एटीएम केंद्राच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गॅस कटरचा वापर करून एटीएम मशीन कापले आणि त्यातील ८,८४,५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. या घटनेत एटीएम मशीनचेही मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी हिताची पेमेंट सर्व्हिसेसचे चॅनल एक्झिक्युटिव्ह अभय बाळासाहेब साळुंके (वय ३६, रा. लातूर) यांनी भुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३२४(५) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
वडगाव शिवारात शेतीसाहित्याची चोरी; चोरट्यांनी CCTV कॅमेराही सोडला नाही
धाराशिव – तालुक्यातील वडगाव शिवारातील एका शेतातून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी शिडी, गाडी आणि टोपल्यांसह सुरक्षेसाठी लावलेला सीसीटीव्ही कॅमेराच चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका ६४ वर्षीय वृद्ध महिलेने दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुष्पा रंगराव शिंदे (वय ६४, रा. समतानगर, धाराशिव) यांची वडगाव शिवारातील गट क्रमांक २५३ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी एकूण २५,००० रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. यामध्ये एक लोखंडी शिडी, तीन प्लॅस्टिकची टोपली, एक लोखंडी गाडा आणि सुरक्षेसाठी लावलेला एक सीसीटीव्ही कॅमेरा यांचा समावेश आहे.
या चोरीप्रकरणी पुष्पा शिंदे यांनी रविवारी, १५ जून रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शेतातून अशाप्रकारे शेतीपयोगी साहित्याची चोरी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.