बेंबळी : धाराशिव तालुक्यातील चिखली येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह ६७ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. १९) बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी श्रीकृष्ण विठ्ठल काकडे (वय ५४) व एका साक्षीदाराचे घर बंद होते. सोमवारी (दि. १६) मध्यरात्री एक ते पहाटे सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या बंद घराचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. या भामट्यांनी घरातील १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख ५ हजार रुपये असा एकूण ६७ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला.
चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर श्रीकृष्ण काकडे यांनी गुरुवारी (दि. १९) पोलिसांत धाव घेतली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३१(५) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बेंबळी पोलीस करत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.






