नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहराला बोरी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हे धरण केवळ तीन किलोमीटर अंतरावर असूनही, नळदुर्गकरांना आठ दिवसातून एकदाच पाणी मिळते. विशेष म्हणजे, हे पाणी दूषित आणि पिवळसर असून पिण्यासाठी अयोग्य आहे. अशा अवस्थेत नळदुर्गकरांचे आरोग्य धोक्यात आले असून, नगर परिषद प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे.
पिण्यासाठी दूषित पाणी, शेतीसाठी मुबलक पुरवठा
२०२४ च्या पावसाळ्यात बोरी धरण तुडूंब भरले होते. यामुळे यंदा नळदुर्ग, अणदूर, सराटी, बाभळगाव यांसारख्या गावांना शेतीसाठी कॉनॉलमधून मुबलक पाणी सोडण्यात आले. मात्र, नळदुर्गकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या हक्कावर नगर परिषद प्रशासनाने पाय ठेवल्याचे चित्र दिसत आहे. धरण उशाला असूनही नळदुर्गकरांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे.
दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
नळदुर्गकरांना मिळणारे पाणी दूषित, पिवळसर आणि आरोग्यास हानीकारक आहे. पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याने नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्यामुळे पोटाचे विकार, त्वचेचे आजार आणि अन्य संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे.
नगर परिषद प्रशासन झोपेत
नळदुर्गकरांच्या या गंभीर समस्येकडे नगर परिषद प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. धरण तुडूंब भरलेले असतानाही आठ दिवसातून एकदाच पाणीपुरवठा केला जातो, तोही दूषित आणि पिवळसर. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जनतेचा संताप उफाळला
नळदुर्गकरांच्या संतापाचा पारा आता चढला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. पाण्याच्या या गंभीर समस्येवर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अन्यथा आंदोलनाचा भडका उडू शकतो.
धरण भरलेले, पाणीही मुबलक, पण प्रशासनाची झोप मात्र अजूनही गाढच! नळदुर्गकरांच्या या पाण्याच्या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन पाण्याचा नियमित व स्वच्छ पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.