धाराशिव – जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२४-२५ अंतर्गत मंजूर झालेल्या अनेक कामांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाने जिल्ह्यातील विकासकामांवर थेट ब्रेक लागला असून, त्यामागे सत्ताधारी भाजप आमदार आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील अंतर्गत संघर्ष कारणीभूत ठरल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतर कामांना स्थगिती
धाराशिवचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २६ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने, शासनाने १ एप्रिल रोजी अधिकृत आदेश काढत कार्यारंभ आदेश नसलेल्या सर्व कामांना स्थगिती दिली आहे.
राजकीय कुरघोडीमुळे स्थगितीचा निर्णय?
या निर्णयामागे एक खास सत्ताधारी आमदाराचा दबाव असल्याची जोरदार चर्चा आहे. कारण काय?
पालकमंत्री सरनाईक यांनी विरोधी पक्षाचे (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिफारशीवर आधारित १० कामांना मंजुरी दिली.
यामुळे नाराज झालेल्या भाजप आमदाराने थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आणि अखेर कामांना स्थगितीचा आदेश निघाला.
“कामांच्या टक्केवारीचे” गुप्त सूत्र फोडले!
सूत्रांनुसार, कामांची ‘टक्केवारी पद्धत’ पूर्वनिश्चित झाली होती:
- सत्ताधारी आमदार – १५%
- विरोधी आमदार – १०%
- पालकमंत्री – ४०%
- खासदार – काहीच नाही
मात्र सरनाईक यांनी मैत्रीच्या नात्याने खासदार ओमराजेंना १०% कामं दिली, त्यामुळे भाजप आमदारांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी राजकीय दबाव आणत योजना स्थगित करण्यास भाग पाडले.
मैत्री, मतभेद आणि राजकीय खदखद
प्रताप सरनाईक हे पूर्वी ठाकरे गटात होते आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी त्यांचे राजकीय मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोघेही एकाच काळात राजकारणात आले.
२६ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्या बैठकीत दोघांमधील हास्यविनोद पाहायला मिळाले. त्याच बैठकीत पालकमंत्र्यांनी संकेतही दिले होते, ज्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पहिली राजकीय ठिणगी पडली.
स्थगितीमुळे २६८ कोटींच्या कामांवर ब्रेक
या संपूर्ण संघर्षामुळे २६८ कोटींपेक्षा जास्त निधीच्या कामांवर तात्पुरता ब्रेक बसला आहे. यामध्ये –
- ८२ वर्ग खोल्या
- २०० पेक्षा अधिक रस्ते
- १०५ डीपी (शेतातील वीजपुरवठा)
- वैद्यकीय व आयुर्वेद रुग्णालय विकास
- पशुधन योजना
- नगरपालिका क्षेत्रातील रस्ते, पथदिवे, उद्याने इ.
विकासाच्या नावाने राजकीय सौदेबाजी!
धाराशिवच्या जनतेसाठी असलेल्या योजनांना राजकीय वर्चस्वाच्या स्पर्धेत गाडलं जात आहे.
‘विकास’ हा शब्द अजेंडा असावा, सौदा नव्हे, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे.
राजकीय मैत्री, टक्केवारीचे आकडे आणि मंत्री-अमदार संघर्ष यामुळे जिल्ह्याचा खरा विकास कोणाच्या गळ्यात पडतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.