धाराशिव – धाराशिव-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कावलदरा येथे आज पहाटे झालेल्या थरारक रोड रॉबरी प्रकरणी, धाराशिव ग्रामीण पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत मोठी कारवाई केली आहे. घटनेच्या काही तासांतच, येडशी टोल नाक्यावर सापळा रचून ४ सराईत आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. फिर्यादीसमोर ओळख परेड केली असता आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे.
काय घडले होते?
गुरुवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास, कावलदरा परिसरात ७ दरोडेखोरांनी राष्ट्रीय महामार्गावर झाडीत दबा धरून दगडफेक केली. ४ ते ५ चारचाकी वाहने अडवून, प्रवाशांना, ज्यात कुटुंबीय होते, त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील रोख रक्कम, सोने, मोबाईल, लॅपटॉप असा लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला. या घटनेने महामार्गावरील सुरक्षेवर आणि रात्रीच्या पोलीस गस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
पोलिसांची यशस्वी कारवाई:
घटनेची माहिती मिळताच, धाराशिव ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मिळालेल्या माहितीच्या आधारे येडशी टोल नाक्यावर तात्काळ नाकाबंदी करून सापळा रचण्यात आला. या प्रभावी सापळ्यात ४ संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन फिर्यादी आणि साक्षीदारांसमोर उभे केले असता, त्यांची ओळख पटली.सात पैकी चार आरोपीना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
सराईत गुन्हेगारांची टोळी:
पोलिसांनी अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांच्यावर यापूर्वी नळदुर्ग पोलीस ठाण्यात डिझेल चोरी प्रकरणी तसेच शेळ्या चोरी प्रकरणी गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे आरोपी मोहा पारधी पिढीवरील असल्याचे समजते.
या जलद अटकेमुळे लुटलेला काही मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता वाढली असून, या टोळीतील आणखी साथीदारांचा किंवा गुन्ह्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र महामार्गावरील कायमस्वरूपी आणि प्रभावी सुरक्षेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.