धाराशिव: जहागीरदारवाडी लमाण तांडा परिसरात जागेच्या जुन्या वादातून एका ३२ वर्षीय व्यक्तीला पाच जणांनी मिळून शिवीगाळ करत स्टीलच्या फायटरने आणि कात्रीने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना २८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी रामदास अंबादास राठोड (वय ३२, रा. जहागीरदारवाडी लमाण तांडा) यांचा आरोपींसोबत जागेवरून वाद होता. घटनेच्या दिवशी, २८ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी तुकाराम राठोड, नितीन तुकाराम राठोड, सागर रतन राठोड, मोतीराम राठोड आणि विजय राठोड (सर्व रा. जहागीरदारवाडी) यांनी गैरकायदेशीर जमाव जमवून रामदास यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर आरोपींनी संगनमत करून रामदास यांना लाथाबुक्यांनी, स्टीलच्या फायटरने आणि कात्रीने मारहाण करून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
या हल्ल्यानंतर रामदास राठोड यांनी ३१ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२),(३), १८९(२), १९१(२), आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.