धाराशिव: सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील दाळींब येथे एका व्यापाऱ्याला अडवून १ लाख १४ हजार रुपयांची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी मोठ्या शिताफीने तपास करत एका दुकानातील कामगारासह दोघांना अटक केली असून, त्यांनीच हा दरोड्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे.
नेमकी घटना काय घडली?
लातूर येथील रहिवासी असलेले फिर्यादी हृषिकेश जाधव हे २८ मार्च २०२६ रोजी मुरूम येथून आपला माल उतरवून परतत होते. त्यावेळी सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील दाळींब येथे ६ अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या ड्रायव्हरला गाडीतून खाली उतरवून गंभीर मारहाण केली आणि त्यांच्याजवळील १ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली. या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२) आणि ३११ अन्वये दरोड्याचा गुन्हा (गु.र.नं. ७७/२०२६) दाखल करण्यात आला होता.
असा उलगडला दरोड्याचा कट:
हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले होते. ३१ मार्च २०२६ रोजी सपोनि कासार आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली. फिर्यादी जाधव यांनी मुरूम येथील ‘उज्वला किराणा’ या दुकानात आपला माल उतरवून १ लाख १४ हजार रुपये घेतले होते. ताब्यात घेतलेला १९ वर्षीय आरोपी अभिषेक राजेंद्र कावडे (रा. कंटेकूर) हा त्याच दुकानात कामाला होता. त्याने फिर्यादीकडे मोठी रोकड असल्याचे पाहिले आणि आपल्या साथीदारांना याची माहिती देऊन दरोड्याचा कट रचला. अभिषेकने स्वतः मोटारसायकलवरून तर त्याच्या इतर साथीदारांनी पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून फिर्यादीच्या गाडीचा पाठलाग केला आणि दाळींब येथे महामार्गावर त्यांना गाठून लुटले.
या गुन्ह्यात पोलिसांनी अभिषेक राजेंद्र कावडे (वय १९) आणि दत्ता व्यंकट जमादार (वय ३३, दोघे रा. कंटेकूर, ता. उमरगा) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून वाट्याला आलेली २०,००० रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल असा एकूण ४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील इतर ६ साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल मुरूम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, आणि त्यांच्या पथकातील अंमलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, नागनाथ गुरव, व रत्नदीप डोंगरे यांनी केली आहे.




