धाराशिव : तालुक्यातील शिंदेवाडी शिवारात विहिरीचे साहित्य काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ४० वर्षीय व्यक्तीला पाच जणांनी मिळून काठीने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालाजी वसंत शिंदे (वय ४०, रा. शिंदेवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना २८ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी शिवारातील शेत गट क्रमांक १५४ मध्ये घडली. विहिरीचे साहित्य काढण्याच्या कारणावरून आरोपी अमोल नंदकुमार नवले, राजेंद्र चंद्रकांत नवले, सतिश दिलीप नवले, अजिंक्य शशिकांत शिंदे आणि ज्ञानेश्वर चांगदेव शिंदे (सर्व रा. शिंदेवाडी) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवली.
आरोपींनी फिर्यादी बालाजी शिंदे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेप्रकरणी बालाजी शिंदे यांनी १५ जून २०२५ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार (कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 189(2), 191(2)(3), 190) गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.