धाराशिव: शहरातील तांबरी विभागात एका अठ्ठावन्न वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तात्यासाहेब बब्रुवान जगदाळे (वय ५८) असे मृत व्यक्तीचे नाव असून, आर्थिक व्यवहारातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २६ जुलै २०२५ रोजी रात्री एक ते तीनच्या सुमारास तांबरी विभागातील नुतन शाळेच्या पाठीमागे असलेल्या जगदाळे यांच्या राहत्या घरात घडली. आरोपी महेश शिवाजी माळी (रा. तांबरी विभाग, धाराशिव), दुरगुडे सर (रा. तांबरी विभाग, धाराशिव) आणि अनिल घोडके (रा. मालेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी मयत तात्यासाहेब यांना आर्थिक व्यवहारातून सातत्याने त्रास दिला होता. या त्रासाला कंटाळून तात्यासाहेब जगदाळे यांनी आत्महत्या केली, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
याप्रकरणी मयताच्या पत्नी, कल्पना तात्यासाहेब जगदाळे (वय ५०) यांनी २२ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महेश माळी, दुरगुडे सर आणि अनिल घोडके यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८ आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.