धाराशिव: ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने कर्जाच्या खाईत लोटलेल्या एका तरुणाने आपल्या पत्नी आणि दोन वर्षांच्या निष्पाप मुलाचा खून करून स्वतःही जीवनयात्रा संपवल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना धाराशिव तालुक्यातील बावी गावात घडली आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरले असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
लक्ष्मण मारुती जाधव (२९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. लक्ष्मण हा गावात ट्रॅक्टर चालक म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तीन वर्षांपूर्वीच त्याने गावातील तेजस्विनी (२१) हिच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या सुखी संसारात दोन वर्षांच्या मुलाच्या आगमनाने आणखी भर पडली होती. मात्र, लक्ष्मणला ऑनलाइन रम्मी खेळण्याचे व्यसन लागले आणि इथूनच त्याच्या कुटुंबाच्या विनाशाची सुरुवात झाली.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रम्मीच्या नादात लक्ष्मणवर मोठा कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने आपली वडिलोपार्जित एक एकर जमीन आणि गावातील एक भूखंडही विकला होता. मात्र, तरीही तो कर्जमुक्त होऊ शकला नाही. सततच्या कर्जबाजारीपणामुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता.
रविवारी रात्री याच तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलले. त्याने आपली पत्नी तेजस्विनी आणि दोन वर्षांच्या मुलाला अन्नातून विष दिले असावे आणि त्यानंतर घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी ११ वाजेपर्यंत जाधव यांच्या घराचा दरवाजा उघडला न गेल्याने शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी पोलिसांना पाचारण केले असता हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह पोलीस दलाने घटनास्थळी धाव घेतली. घराचे दार उघडताच आतमध्ये तिघांचेही मृतदेह पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. एका क्षणात होत्याचे नव्हते झालेल्या या जाधव कुटुंबाच्या दुर्दैवी अंतामुळे बावी गावावर शोककळा पसरली आहे. ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा कसा बळी घेतला, याचे हे एक विदारक उदाहरण आहे.