मंडळी, आपलं धाराशिव जिल्हा म्हणजे काय विचारू नका! कधीकाळी कुसळी गवतासाठी ओळख होती, पण आता जास्त ओळख आहे ती म्हणजे ‘दुष्काळी’ आणि ‘राजकीय आखाडा’ म्हणून! इथे पाऊस कमी पडो वा जास्त, पण राजकीय ‘वॉर’ मात्र बारा महिने तेरा काळ सुरूच!
आणि या राजकीय आखाड्यात अधूनमधून मुंबईचे तारे-तारक पण हजेरी लावतात. आपले सध्याचे पालकमंत्री, प्रतापराव सरनाईक, थेट मुंबईचे! ते आले की मग नुसता मीटिंगा आणि उद्घाटनांचा धडाका! २६ जानेवारीला आले, तेव्हा खासदार ओमराजेंशी (ठाकरे सेना) त्यांची खास ‘दोस्ती’ दिसली. आता १ मे ला परत आले, निमित्त होतं महाराष्ट्र दिनाचं आणि जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या समारोपाचं!
आता कार्यक्रम कसला? तर जलव्यवस्थापनाचा! पण झालं काय? पाण्याच्या नियोजनापेक्षा राजकीय टोलेबाजीचंच व्यवस्थापन जोरदार झालं! व्यासपीठावर अध्यक्षस्थानी पालकमंत्री सरनाईक बसलेले, आणि त्यांच्या आजूबाजूला कोण? तर एका बाजूला खासदार ओमराजे निंबाळकर (ठाकरे सेना) आणि दुसऱ्या बाजूला आमदार राणा जगजितसिंह पाटील (भाजप)! आता हे दोघे कोण? तर एकमेकांचे चुलत भाऊ! पण राजकीय मैदानात? छत्तीसचा आकडा! म्हणजे असं म्हणतात की त्यांच्यात आडवा विस्तवही जात नाही!
आणि मग काय, माईक हातात आल्यावर खरी जुगलबंदी रंगली! खासदार साहेबांनी कुणाचंही नाव न घेता ‘दोन पिढ्यांपासून’ फक्त पाणी येणार असल्याचीच आश्वासनं कशी दिली जातायत, याचा पाढा वाचला. त्यांचा रोख कुणाकडे होता, हे उपस्थितांना वेगळं सांगायला नको!
मग आमदार साहेबांची बारी आली! त्यांनीही मग नाव न घेता सांगितलं की पाणी आणायच्या कामात कसे ‘झारीतले शुक्राचार्य’ अडथळे आणतात! आता हे शुक्राचार्य कोण, हे शोधायचं काम परत जनतेवर!
म्हणजे बघा, कार्यक्रम पाण्याच्या नियोजनाचा, पण चर्चा ‘पिढ्यांची’ आणि ‘शुक्राचार्यांची’! आणि हे सगळं कोणाच्या साक्षीने? तर आपले मुंबईकर पालकमंत्री! ते बिचारे बघत असतील, की पाणी आणायचं सोडून हे भलतंच काय सुरू आहे!
एक मात्र खरं, या सगळ्यात उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली! पाणी कधी येणार, कसं येणार हे देव जाणे, पण नेत्यांची ही ‘तू तू – मै मै’ ऐकून लोकांना निदान काही वेळ विरंगुळा तरी मिळाला!
तर मंडळी, धाराशिवच्या जनतेला पाणी मिळेल तेव्हा मिळेल, तोवर या राजकीय कलगीतुऱ्याचा आनंद घ्या! कारण इथे पाण्याच्या धारा कधी वाहतील याची गॅरंटी नाही, पण राजकीय टोलेबाजीच्या धारा मात्र अखंड वाहत राहणार, हे नक्की!