धाराशिव – उस्मानाबाद रेल्वे स्थानकाच्या नामांतराची प्रक्रिया सुरू असून, केंद्र सरकार व रेल्वे विभागाकडून “धाराशिव” हे नाव अधिकृतपणे वापरण्यास मान्यता मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आज, , धाराशिव रेल्वे स्थान येथे एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत अटल अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या स्थानकाच्या विकासात्मक कामांचा आणि धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या नवीन रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान खासदार निंबाळकर यांनी रेल्वे स्थानकाच्या कामाचा दर्जा उच्च राखण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कठोर सूचना दिल्या. कामांची नियमितपणे पाहणी करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या मार्गाच्या कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाईपलाईन, अंडरपास आणि रस्त्यांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्याचेही त्यांनी सांगितले.
विविध प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीचे आदेश
या बैठकीत विविध स्थानिक प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली व त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश खासदारांनी दिले:
- स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग – जागीरदार वाडी: नागरिकांनी अपुऱ्या रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले असता, अन्नपाची (अतिक्रमण हटवून) निर्माण करून मार्ग सुकर करण्याचे आदेश देण्यात आले.
- धाराशिव-लातूर रेल्वे मार्गावरील अंडरपास: येथील सिमेंट रस्त्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्याने, त्याची तात्काळ तपासणी करून सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- कुमाळवाडी-गड देवदरी रस्ता (मुख्यमंत्री ग्राम सडक योजना): रेल्वे विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राअभावी अर्धवट राहिलेले काम त्वरित पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
- गोडाऊन शेडचे काम – धाराशिव स्थानक: सध्या सुरू असलेले १०० मीटरचे गोडाऊन अपुरे पडण्याची शक्यता असल्याने, ३०० मीटर लांबीचे नवीन गोडाऊन उभारण्यासाठी प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले.
- बार्शी तालुका – कासारवाडी व घारीपुरी अंडरपास: पावसाळ्यात या अंडरपासमध्ये पाणी साठून दळणवळणात अडथळे निर्माण होतात. यावर उपाय म्हणून सिमेंट नाली बांधण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस आमदार कैलास पाटील, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक शैलेन्द्र परिहार, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) अंशुमाली कुमार, उपमुख्य अभियंता (Dy.CE) प्रदीप बानसोडे, मुख्य अभियंता, बांधकाम विभाग (CE, Const.), वरिष्ठ विभागीय व्यापारी व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय अभियंता, सेंट्रल रेल्वे अवधोष मीणा यांच्यासह रेल्वे स्थानक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या सूचना गांभीर्याने घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी यावेळी दिले.