धाराशिव – धाराशिव शहरातील एका चायनिज रेस्टॉरंट मालकाला केवळ खाल्लेल्या पदार्थांचे बिल मागितल्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून शिवीगाळ व जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी मालकाकडील रोख रक्कम हिसकावून घेत ५१ हजार रुपयांच्या वर्गणीची मागणी केली, हॉटेलमध्ये तोडफोड केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
फिर्यादी संकेत सूर्यकांत सूर्यवंशी (वय ३७, रा. शिवनेरी चौक, तांबरी विभाग, धाराशिव) यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील चौपाटी येथे ‘हॉटेल सूर्या चायनिज रेस्टॉरंट’ आहे. फिर्यादीनुसार, २५ एप्रिल रोजी सायंकाळी आरोपी आकाश बनसोडे, जानराव ॲम्ब्युलन्सचा चालक आणि इतर चार अनोळखी इसम (सर्व रा. धाराशिव) हे त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आले होते.
फिर्यादी सूर्यवंशी यांनी त्यांना खाल्लेल्या पदार्थांचे बिल मागितले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच एका टोकदार वस्तूने वार करून जखमी केले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी फिर्यादीकडील ५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि येत्या २७ एप्रिल रोजी असलेल्या जयंतीसाठी ५१ हजार रुपयांची वर्गणी द्यावी लागेल, अशी मागणी केली. यानंतर आरोपींनी रेस्टॉरंटमधील कॅश काउंटरची काच फोडून नुकसान केले आणि फिर्यादी संकेत सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी संकेत सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(३), १९०, ११९(१), ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.