धाराशिव – संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान २.० अंतर्गत निवडक गावांची पाहणी करण्यासाठी विभागीय तपासणी समिती आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. या समितीने जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील औराद आणि भूम तालुक्यातील घाटनांदूर या दोन गावांना भेटी देऊन ग्रामस्वच्छतेच्या अनुषंगाने गावांची प्रगती, स्वच्छता उपाययोजना आणि ग्रामस्थांचा सहभाग याचा सविस्तर आढावा घेतला.
या विभागीय तपासणी समितीमध्ये सहायक आयुक्त (विकास) तथा सदस्य सचिव उद्धव होळकर, सहायक आयुक्त (विकास) / आस्थापना दिलीप गुमरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांचे प्रतिनिधी वसंत पोतदार, संचालक माहिती व जनसंपर्क विभागीय कार्यालयाचे प्रतिनिधी नंदु पवार, स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी हनुमंत गादगे यांच्यासह महसूल, आरोग्य, पाणीपुरवठा, पंचायत राज आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
समितीने दोन्ही गावांमध्ये सार्वजनिक शौचालये, गटारी व्यवस्थापन, कचऱ्याची विलगीकरण व्यवस्था, जलसंवर्धन, हरितभिंती, भिंतीचित्रण आणि वस्ती स्वच्छता यांसारख्या विविध बाबींची बारकाईने पाहणी केली.
औराद गावात ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची प्रभावी यंत्रणा कार्यान्वित असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. तसेच, लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि अंगणवाडी परिसर स्वच्छ व सुंदर असल्याचे दिसून आले.
घाटनांदूर गावातही स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय काम झाल्याचे समितीला आढळले. घराघरातून कचरा संकलन, जलसंवर्धनासाठी बांधलेली पाण्याची टाकी आणि गटारींची नियमित स्वच्छता या बाबींची पाहणी करण्यात आली.
पाहणी दौऱ्यादरम्यान समितीने दोन्ही गावांतील ग्रामस्थांशी स्वच्छतेबाबत थेट संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा योग्य लाभ घेत गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.
या पाहणीमुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २.० अंतर्गत गावांनी स्वच्छतेच्या दिशेने उचललेली ठोस पावले आणि लोकसहभागातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा प्रकर्षाने दिसून आली. विभागीय समिती आपला पाहणी अहवाल लवकरच शासनाकडे सादर करणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना जिल्हास्तरावर गौरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी औरादचे सरपंच सुशील जाधव, उपसरपंच रमेश कारभारी, ग्रामसेवक एस.पी. नंदरगे तसेच घाटनांदूरचे सरपंच रावसाहेब बंदवान, उपसरपंच खेलदेव बेरगळ, ग्रामसेवक एस.जी. नागटिळक यांच्यासह दोन्ही गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.