धाराशिव – परंडा तालुक्यातील जवळा (नि) येथील सौ. प्रतिभा पवार कन्या हायस्कूलमधील शिक्षिका श्रीमती किरणताई चंद्रकांत पाटील यांच्या वीस वर्षांपूर्वीच्या नियुक्तीला जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मान्यता नाकारल्यानंतर आता हे प्रकरण लातूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयापर्यंत पोहोचले आहे. श्रीमती पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर शिक्षण उपसंचालकांनी येत्या १६ एप्रिल रोजी या प्रकरणी सुनावणी ठेवली आहे. दुसरीकडे, जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी मान्यता नाकारल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाला वेळीच दिली होती का, यावरून प्रशासकीय समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काय आहे सद्यस्थिती?
श्रीमती किरणताई पाटील (ज्या संस्थाचालक राहुल कारकर यांच्या पत्नी आहेत) यांच्या १२ जुलै २००४ पासूनच्या माध्यमिक सहशिक्षक पदावरील नियुक्तीस वैयक्तिक मान्यता देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाने १२ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या पत्राद्वारे फेटाळला होता. आरक्षणाचा अनुशेष आणि इतर त्रुटी हे मुख्य कारण देण्यात आले होते.
या निर्णयानंतर, श्रीमती पाटील यांनी ७ मार्च २०२५ रोजी लातूर येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात तक्रार निवारण अर्ज सादर केला. या अर्जाच्या अनुषंगाने, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी १८ मार्च २०२५ रोजी पत्र काढून, १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लातूर कार्यालयात सुनावणी निश्चित केली आहे. या सुनावणीसाठी धाराशिवच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक), संस्थेचे अध्यक्ष/सचिव, मुख्याध्यापक आणि स्वतः श्रीमती पाटील यांना मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
समन्वयाचा अभाव?
धाराशिव शिक्षण विभागाने ऑक्टोबर २०२४ मध्येच मान्यता नाकारली असताना, उपसंचालक कार्यालयाने मार्च २०२५ मध्ये तक्रार दाखल झाल्यावर पुन्हा सुनावणी ठेवली आहे. यामुळे दोन्ही कार्यालयांमध्ये योग्य समन्वय होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी आपला निर्णय उपसंचालक कार्यालयास कळवला होता का? जर कळवला असता, तर उपसंचालकांनी पुन्हा सुनावणीची प्रक्रिया केली असती का? असे सवाल शिक्षण वर्तुळात विचारले जात आहेत. यापूर्वीही जिल्हा शिक्षण विभागाच्या पत्राच्या तारखेवरून आणि ते मिळण्यास झालेल्या कथित विलंबावरून वाद निर्माण झाला होता. आता या नव्या घडामोडीने प्रशासकीय कामकाजातील समन्वयाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
आता १६ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत काय निर्णय होतो आणि या प्रकरणाला कोणते नवे वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.