धाराशिव – एकीकडे धाराशिव-तुळजापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित झाला असून २४ तास वर्दळीचा आहे, तर दुसरीकडे याच मार्गावर प्रवाशांची सुरक्षा पूर्णपणे रामभरोसे असल्याचे भयावह वास्तव आज पहाटे उघडकीस आले. कावलदरा परिसरात पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ५ ते ७ मास्कधारी दरोडेखोरांनी अक्षरशः हैदोस घातला. दगडफेक करून ४-५ चारचाकी गाड्या अडवल्या, प्रवाशांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडील लाखोंचा ऐवज लुटून नेला. या घटनेने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि महामार्गावरील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलीस झोपेत, दरोडेखोर सक्रिय?
हा धाराशिव-तुळजापूर मार्ग केवळ चार पदरी रस्ता नसून सोलापूर, उमरगा, बीड, छत्रपती संभाजीनगरकडे सतत वाहतूक असणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. हजारो प्रवासी कुटुंबीयांसह या मार्गावरून प्रवास करतात. हा परिसर धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. धक्कादायक बाब म्हणजे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर पोलीस गस्तच नसते किंवा असली तरी ती नावापुरतीच असते. पोलीस प्रशासन झोपेत असताना दरोडेखोर मात्र पूर्णपणे सक्रिय असल्याचे चित्र या घटनेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांच्या जीविताशी आणि मालमत्तेशी खेळणारा हा गंभीर प्रकार प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कळस मानला जात आहे.
दरोड्याचा थरार आणि प्रशासकीय उदासीनता
पहाटेच्या अंधारात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी अचानक रस्त्यावर दगडफेक केली. गाड्या थांबताच त्यांचे टायर फोडले आणि प्रवाशांवर हल्ला चढवला. महिला, पुरुष, मुले कोणालाही न जुमानता मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, महागडे मोबाईल, लॅपटॉप असा लाखोंचा मुद्देमाल हिसकावून घेतला. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका पीडित प्रवाशाने तातडीने पोलिसांना संपर्क साधूनही, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा ते एक तास लागला! पोलिसांच्या या दिरंगाईमुळे दरोडेखोर सहज पसार होण्यात यशस्वी झाले.
या भ्याड हल्ल्याने आणि प्रशासकीय उदासीनतेने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना पसरली आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस आता तपास करत असले तरी, रात्रीच्या गस्तीतील हलगर्जीपणा आणि उशिरा मिळालेला प्रतिसाद यामुळे नागरिक संतप्त आहेत. केवळ तपास करण्याचे नाटक न करता, प्रशासनाने तातडीने महामार्गावर २४ तास कडक पोलीस बंदोबस्त लावावा आणि या दरोडेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.