धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आता एक वेगळेच वळण लागले आहे. स्वतःच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आखलेला डाव त्यांच्यावरच उलटल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांना डावलून सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना शिवसेनेने जोरदार सुरुंग लावला असून, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या नव्या आणि आक्रमक भूमिकेमुळे जिल्हा परिषदेचे संपूर्ण गणितच बदलणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या ‘सहल’ राजकारणाला आणि सोशल मीडियावरील ‘फेक नॅरेटिव्ह’ला शिवसेनेने सडेतोड उत्तर दिले असून, आमदार राणा पाटील यांची चहुबाजूंनी कोंडी झाली आहे.
जिल्हा परिषद संख्याबळ : बहुमताचा आकडा २८ (एकूण जागा ५५)
जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी आघाड्यांची जुळवाजुळव सुरू आहे:
-
भाजप: १९
-
शिवसेना (शिंदे गट): १५
-
शिवसेना (ठाकरे गट): ८
-
राष्ट्रवादी: ६
-
काँग्रेस: ३
-
अपक्ष: ४
-
समाजवादी पक्ष: १
‘सहली’चा डाव फसला, वाढत्या खर्चामुळे सदस्य माघारी
भाजपकडे केवळ १९ जागा असल्याने त्यांना बहुमतासाठी शिवसेनेच्या (शिंदे गट) १५ सदस्यांची नितांत गरज आहे. यातूनच राणा पाटलांनी पत्नीला झेडपी अध्यक्ष करण्याच्या घाईत भाजप, राष्ट्रवादी, अपक्ष आणि शिवसेनेच्या दोन सदस्यांना (सुनील बनसोडे आणि पूजा शिंदे) घेऊन थेट ‘सहल’ काढली होती. मात्र, अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लांबल्याने आणि पंचतारांकित हॉटेलचा व विमानवारीचा खर्च झेपेनासा झाल्याने अखेर कंटाळून सर्व सदस्य गुपचूप धाराशिवला परतले.
शिवसेनेच्या या दोन सदस्यांना पळवून नेल्याने शिवसेना आक्रमक झाली. शिवसेना नेते योगेश केदार आणि अविनाश खोपे-पाटील यांनी, “आधी पळवून नेलेले सदस्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे हजर करा,” अशी अट घातली. या दबावामुळे राणा पाटलांना नमते घेत या सदस्यांना एकनाथ शिंदे यांच्यासमोर हजर करावे लागले.
फेक नॅरेटिव्हची पोलखोल आणि राजन साळवींचा ‘मास्टरस्ट्रोक’
या घडामोडींदरम्यान, राणा पाटील यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर “तानाजी सावंत यांना वगळून भाजप शिवसेनेच्या ७ सदस्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार,” अशा खोट्या बातम्या पेरल्या गेल्या. युवासेना नेते अविनाश खोपे-पाटील यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत, “येड्यागत कारभार… धाराशिवला विकासापासून वंचित ठेवण्याचे काम तुम्ही केले आहे,” असा प्रहार केला.
या सर्व अफवांचा फुगा शिवसेना संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी एकाच पोस्टमध्ये फोडला. एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो शेअर करताना साळवी यांनी आमदार राणा पाटील यांना त्या फोटोतून चक्क ‘कट’ (क्रॉप) केले आणि “शिवसेना अभेद्य 🚩” असे सूचक कॅप्शन दिले. या मास्टरस्ट्रोकमुळे तानाजी सावंत यांना डावलले नसल्याचा आणि शिवसेना एकसंध असल्याचा स्पष्ट संदेश गेला.
पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा सज्जड इशारा
या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम भूमिका घेत राणा पाटील यांच्या आशांवर पाणी फेरले आहे.
-
विरोधी बाकांवर बसू, पण फूट पडू देणार नाही: “सत्ता महत्त्वाची असली तरी पक्षाची एकजूट त्याहून अधिक महत्त्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू, मात्र शिवसेनेत कोणतीही फूट पडू देणार नाही,” असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.
-
तानाजी सावंत आणि पक्ष एकसंध: तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून पक्षात मतभेद असल्याचा आभास निर्माण करणाऱ्यांना त्यांनी फटकारले. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसेना अखंड आणि अभेद्य आहे. कोणत्याही दबावाला किंवा अफवांना आम्ही बळी पडणार नाही,” असे ते म्हणाले.
-
वरिष्ठ पातळीवर ठरणार रणनीती: “मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा श्रीमती सुनिताताई पवार यांच्याशी चर्चा करूनच जिल्ह्याची पुढील रणनीती ठरवेन,” असे सांगत त्यांनी स्थानिक स्वयंभू नेत्यांना भाष्य न करण्याची सक्त ताकीद दिली आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका आणि शिवसेनेने दिलेला एकजुटीचा संदेश यामुळे आमदार राणा पाटील यांचा तानाजी सावंतांना बाजूला करून सत्तेचे समीकरण जुळवण्याचा मनसुबा उधळला गेला आहे. आता वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर धाराशिव जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






