धाराशिव: जिल्हा परिषदेचा निकाल लागून एक महिना उलटला तरी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ‘प्रायव्हेट जेट’ आणि थ्री-स्टार हॉटेल्सची ‘विमानवारी’ करून कंटाळलेले सदस्य अखेर धाराशिवला परतले आहेत. मात्र, आता सत्तेचा चेंडू थेट मुंबईत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या दरबारात गेला असून, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला वरिष्ठांकडूनच लाल कंदील दाखवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
शिंदे-सरनाईकांच्या दरबारात सदस्यांची हजेरी
भाजपचे आमदार राणा पाटील यांनी सहलीवर नेलेले (शिवसेनेच्या आरोपानुसार ‘पळवलेले’) शिवसेनेचे दोन सदस्य – सुनील बनसोडे (शहापूर) आणि पूजा शिंदे (डिकसळ) यांच्यासह बंडखोरी केलेले तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना अखेर मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर हजर करण्यात आले आहे.
अध्यक्षपदाचा फॉर्म्युला आणि अर्चना पाटलांना थेट विरोध
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यात झालेल्या चर्चेनुसार, ‘अध्यक्ष भाजपचा आणि उपाध्यक्ष शिवसेनेचा’ या सूत्रावर एकमत होताना दिसत आहे. मात्र, पेच वेगळ्याच ठिकाणी अडकला आहे:
-
घराणेशाहीला नकार: आमदार राणा पाटील यांना स्वतःच्या पत्नी अर्चना पाटील यांना अध्यक्ष करायचे आहे. पण, याला शिंदे आणि सरनाईक यांनी स्पष्ट नापसंती दर्शवली आहे.
-
सर्वसामान्य चेहरा: झेडपी अध्यक्षपदी एखाद्या ‘सर्वसामान्य’ घरातील आणि तळागाळातील सदस्याला संधी द्यावी, अशी ठाम भूमिका या नेत्यांनी घेतली आहे.
-
अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती: या सत्तास्थापनेचे सर्वाधिकार एकट्या राणा पाटील यांच्याकडे नाहीत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.
सोशल मीडियावरून ‘वावड्या’ आणि ‘फेक नॅरेटिव्ह’
मुंबईत वाटाघाटी सुरू असताना धाराशिवमध्ये वेगळेच राजकारण तापले आहे. राणा पाटील गटाच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर खोट्या बातम्या पेरण्यास सुरुवात केली आहे. महायुतीची सत्ता स्थापन करताना ‘किंग मेकर’ असलेले शिवसेनेचे नेते आ. तानाजी सावंत यांना डावलूनच सत्ता स्थापन केली जाईल, अशा वावड्या उठवल्या जात आहेत. यामुळे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमधील तणाव आणखी वाढला आहे.
‘गुवाहाटी २.०’ चा कंटाळवाणा शेवट
अध्यक्षपदाच्या निवडणुकीला वेळ असल्याने भाजप, राष्ट्रवादी, अपक्ष आणि शिवसेनेचे दोन असे एकूण ३१ सदस्य कोकण आणि कर्नाटकात नॉट रिचेबल झाले होते. जंगल सफारी, गोकर्णचा ‘ओम बीच’ आणि शेवटी ‘प्रायव्हेट जेट’ने घेतलेली एन्ट्री यामुळे धाराशिवची जनता तीव्र संताप व्यक्त करत होती. दुष्काळी जिल्ह्यात सत्तेसाठी सुरू असलेल्या या उधळपट्टीला आता पूर्णविराम मिळाला असून, सर्व सदस्य कंटाळून धाराशिवमध्ये परतले आहेत.
सध्याचे पक्षीय बलाबल (एकूण जागा – ५५):
-
भाजप: १८
-
शिवसेना (शिंदे गट): १५ (यापैकी ८ सदस्य तानाजी सावंत गटाचे)
-
शिवसेना (ठाकरे गट): ८
-
राष्ट्रवादी (अजित पवार गट): ६
-
अपक्ष: ४
-
काँग्रेस: ३
-
समाजवादी पक्ष: १
आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे. तानाजी सावंत यांना डावलून भाजप सत्ता स्थापन करणार की सर्वसामान्य चेहऱ्याला संधी देत महायुतीचा ‘धर्म’ पाळला जाणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.





