धाराशिव: रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर आले आणि त्यांच्याच पक्षात उभी फूट पडल्याचं चव्हाट्यावर आलं! साहेबांना भेटायला निघालेल्या ५० हून अधिक निष्ठावान कार्यकर्त्यांना चक्क पोलिसांनीच ‘स्थानबद्ध’ केलं. कारण काय? तर, ‘भाजपच्या दावणीला बांधलेल्या’ स्थानिक पदाधिकाऱ्यांचे प्रताप शिंदेंच्या कानावर जाऊ नयेत, हीच ती पडद्यामागची खेळी!
नेमकं घडलं काय?
जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर कसा अन्याय झालाय, याचा पाढा हे कार्यकर्ते वाचणार होते. पण त्यांचा आवाज नेत्यांपर्यंत पोहोचण्याआधीच दाबण्यात आला. यामुळे धाराशिव शिवसेनेत ‘दोन गट’ सक्रिय असल्याचं उघड झालं आणि या असंतोषाचा भडका उडाला.
सोलापुरात ‘डॅमेज कंट्रोल’ आणि मोठी उलथापालथ!
धाराशिवमधली ही अंतर्गत बंडाळी थेट वरिष्ठांपर्यंत पोहोचली. अखेर पक्षातली ही आग विझवण्यासाठी आज सोलापुरात तातडीची ‘डॅमेज कंट्रोल’ बैठक बोलावण्यात आली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थितीत या बंडाळीची गंभीर दखल घेण्यात आली.
‘बरखास्त’ – एका शब्दाने उडवली खळबळ!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत मोठा निर्णय घेत अजित पिंगळे यांची प्रभारी जिल्हाप्रमुख पदावरून थेट उचलबांगडी करण्यात आली आहे! या वृत्ताला बळ देणारा एक ‘सूचक बॉम्ब’ शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी सोशल मीडियावर टाकला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये फक्त एकच शब्द लिहिलाय – “बरखास्त.”


साळुंकेंच्या या एकाच शब्दाने आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांचे पेव फुटले आहेत. निष्ठावंतांचा आवाज दाबणाऱ्यांची खरोखरच ‘बरखास्ती’ झाली आहे का? धाराशिवच्या राजकारणात हा नवा ट्विस्ट आता कोणतं वळण घेणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.







