नळदुर्ग : सोयाबीनला चांगला भाव देण्याचे आमिष दाखवून ५६ शेतकऱ्यांची तब्बल १ कोटी २ लाख ९ हजार ७०३ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील सिद्राम रगबले, सुमित रगबले आणि खंडू उर्फ विजयकुमार तम्मा नामणे (सर्व रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनी संगनमत करून वडगाव (देव) येथील मारुती मंदिराजवळ परिसरातील शेतकऱ्यांशी संपर्क साधला.
“आमचा औरंगाबाद आणि पुण्यातील सोयाबीन खरेदी कंपन्यांशी थेट संपर्क असून, आम्ही तुमच्या सोयाबीनला ४,७०० रुपये प्रति क्विंटल भाव देऊ,” असे आमिष आरोपींनी शेतकऱ्यांना दाखवले. इतर ठिकाणी सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास तयार झाले.
आरोपींनी शेतकऱ्यांना एकूण रकमेपैकी ६० टक्के रक्कम आता देतो आणि उर्वरित ४० टक्के रक्कम एका महिन्याने देण्याचे आश्वासन दिले. यावर विश्वास ठेवून अशोक धुळाप्पा वाघमारे (वय ६५, रा. वडगाव देव) यांच्यासह इतर ५५ शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन आरोपींना विकला.
मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही आरोपींनी उर्वरित ४० टक्के रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अनेकदा मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले.
अखेर, याप्रकरणी अशोक वाघमारे यांनी २३ जून २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी स्वप्नील रगबले, सुमित रगबले आणि खंडू नामणे या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) आणि ३(५) अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.