धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांना तात्काळ दुप्पट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे. शुक्रवारी (दि. २३) याबाबत निवेदन देण्यात आले.
दुधगावकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, २२ मे २०२५ पर्यंत धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. सुमारे ३५० हेक्टर क्षेत्रावरील फळबागा, पिके आणि भाजीपाला यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ४० जनावरे दगावली असून ५० ते ६० घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यांतील आठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून दोन व्यक्तींचा वीजेच्या धक्क्याने बळी गेला आहे.
या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी दुधगावकर यांनी केली आहे. तसेच, अवकाळी पावसामुळे मृत झालेल्या मानव, गाय, म्हैस, बैल, घोडा, शेळी, मेंढी, वासरे, रेडकू, कोंबड्या यांच्या सानुग्रह अनुदानात दुप्पट वाढ करून येत्या आठ दिवसांत संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.