तुळजापूर- तालुक्यातील मौजे सिंदफळ येथील एका शेतजमिनीची मोजणी नियमबाह्य पद्धतीने करून जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप एका नागरिकाने केला आहे. या तक्रारीची दखल घेत, राज्याच्या जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे धाराशिव जिल्ह्यातील महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
वरुण अनंत झांजले यांच्या वतीने मयूर उमेश सोनवणे यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, धाराशिव यांच्याकडे एक अर्ज दाखल केला होता. या अर्जानुसार, मौजे सिंदफळ येथील गट नंबर २८६ मधील जमिनीची पोट हिस्सा मोजणी २ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आली. ही मोजणी करताना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नाही, असा आरोप अर्जदाराने केला आहे.
अर्जदार झांजले यांच्या कुटुंबीयांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, तुळजापूर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी मोजणी अर्जदार कुलदीप देवीचंद अग्रवाल यांच्याशी संगनमत करून चुकीच्या पद्धतीने मोजणी केली. या प्रक्रियेत जमिनीची मूळ कागदपत्रे, रेकॉर्ड किंवा प्रत्यक्ष परिस्थिती तपासण्यात आली नाही. या बेकायदेशीर कृत्यामुळे अर्जदारांना त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व ही बेकायदेशीर मोजणी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
जमाबंदी आयुक्तालयाची गंभीर दखल
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे यांच्या कार्यालयाने ३ जून २०२५ रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. अर्जदार मयूर सोनवणे यांच्या अर्जाचा संदर्भ देत, पुणे कार्यालयाने भूमी अभिलेख, छत्रपती संभाजीनगर प्रदेशच्या उपसंचालकांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या आदेशात म्हटले आहे की, “उपअधीक्षक भूमी अभिलेख, तुळजापूर यांनी बेकायदेशीर पद्धतीने कोणतेही कागदपत्रे व वास्तविक रेकॉर्ड तपासणी न करता काम केले बाबत तक्रार प्राप्त झाली आहे.” या अनुषंगाने, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २३४ अन्वये उप अधीक्षक भूमी अभिलेख, तुळजापूर येथील संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि मोजणी अर्जदार कुलदीप देवीचंद अग्रवाल व इतर यांच्यावर चौकशी करून फौजदारी कारवाई करण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
या चौकशीचा अहवाल तातडीने पुणे येथील मुख्य कार्यालयाला सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशाच्या प्रती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, धाराशिव आणि तक्रारदार मयूर सोनवणे यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.