धाराशिव: एका बाजूला निसर्गाचा अस्मानी तडाखा आणि दुसऱ्या बाजूला राजकीय नेत्यांच्या संवेदनाहीनतेचा सुलतानी झटका, या दुहेरी संकटात धाराशिवचा बळीराजा सापडला आहे. देशातील मागास जिल्ह्यांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या आणि दुष्काळाने नेहमीच पोळलेल्या या जिल्ह्यावर यंदा मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मात्र, या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी, स्थानिक आमदार राणा पाटील यांनी दिलेला ‘डिजिटल’ सल्ला टीकेचा विषय ठरला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. भाजीपाला, फळबागा मातीमोल झाल्या आहेत, अनेकांची शेतजमीन खरवडून गेली आहे आणि बांध फुटल्याने होत्याचे नव्हते झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात भविष्याची चिंता दाटली असताना, त्यांचे लोकप्रतिनिधी मात्र ‘भावनांच्या लॉकडाऊन’मध्ये असल्याचे चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर, तुळजापूरचे आमदार राणा पाटील यांनी काही नुकसानग्रस्त गावांना भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरा, पण त्यांची देहबोली आणि चेहऱ्यावरचे हावभाव शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले. पीडित शेतकरी आपल्या नुकसानीचा पाढा वाचत असताना, आमदारांच्या चेहऱ्यावर दिसणारे उपहासात्मक हास्य आणि भावनाशून्य प्रतिसाद पाहून अनेकांना धक्का बसला. जणू काही ही पाहणी नसून एक औपचारिक ‘फोटोसेशन’ आहे, अशा थाटात त्यांचा वावर होता.
या दौऱ्याचा कळस म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला अजब सल्ला. सर्व व्यथा ऐकून घेतल्यावर आमदार महोदय म्हणाले, “काही अडचण असेल तर तहसीलदारांना एसएमएस करा.” हा ‘क्रांतिकारक’ उपाय ऐकून शेतकरी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. ज्यांच्याकडे साधा मोबाईल नाही, ज्यांना अक्षरओळख नाही, त्या अडाणी शेतकऱ्याने तहसीलदारांना संदेश कसा पाठवायचा? आणि ज्यांच्याकडे मोबाईल आहे, त्यांच्या ‘एसएमएस’ला सरकारी बाबू उत्तर देतील, याची हमी कोण देणार? बरं , तहसीलदार यांचा मोबाईल नंबर किती जणांकडे आहे ? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.
मुंबईच्या आलिशान ‘ताज’ हॉटेलमध्ये बसून जिल्ह्याचे राजकारण करणाऱ्या आमदार राणा पाटील यांना चिखलात राबणाऱ्या शेतकऱ्याचे दुःख आणि त्याच्या वेदना कशा कळणार? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. शेतकऱ्याला गरज आहे ती धीराची, थेट मदतीची आणि शासकीय यंत्रणेला कामाला लावणाऱ्या खंबीर नेतृत्वाची; ‘एसएमएस’च्या पोकळ सल्ल्याची नव्हे. आमदारांचा हा ‘डिजिटल’ फार्स म्हणजे शेतकऱ्यांच्या गरिबीची आणि त्यांच्या अगतिकतेची उडवलेली खिल्लीच आहे, अशी तीव्र भावना धाराशिवच्या मातीत उमटत आहे.