मुरुम – मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेळंब तांडा येथे मोटरसायकल घेण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेला लाथाबुक्क्यांनी तसेच दगड व लाकडाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
या प्रकरणी रेश्मा संतोष चव्हाण (वय २९, रा. बेळंब तांडा, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी संतोष काशिनाथ चव्हाण, विनोद काशिनाथ चव्हाण आणि चंम्पाबाई काशिनाथ चव्हाण (तिघे रा. बेळंब तांडा) यांनी रेश्मा चव्हाण यांना ‘तू मोटरसायकल का घेऊन गेलीस’ असे विचारत शिवीगाळ केली.
या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. आरोपींनी रेश्मा चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच दगड व लाकडाचा वापर करूनही त्यांना मारले. यात त्या जखमी झाल्या. यावेळी आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
रेश्मा चव्हाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून मुरुम पोलिसांनी २२ एप्रिल २०२५ रोजी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता च्या नमूद कलमांन्वये (118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये) गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास मुरुम पोलीस करत आहेत.