नळदुर्ग: मिरवणुकीमध्ये धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाला चौघांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी लेझीमने मारहाण करून जखमी केल्याची घटना नळदुर्ग शहरात घडली आहे. पीडित तरुणाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली असून, याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश भारत जाधव (वय ३०, रा. आयोध्या नगर, नळदुर्ग) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास, नळदुर्ग शहरातील चौडी चौक ते डीसीसी बँक दरम्यानच्या रस्त्यावर ही घटना घडली.
फिर्यादीनुसार, अविनाश जाधव हे मिरवणुकीतून जात असताना त्यांचा आरोपींना धक्का लागला. याच कारणावरून आरोपी गुरुप्रसाद शिवा धुमाळ, सागर राठोड, चेतन सिदमल्ले आणि शिवा धुमाळ (सर्व रा. नळदुर्ग) यांनी अविनाश यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि चौघांनी मिळून जाधव यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी मिरवणुकीतील लोखंडी लेझीमने अविनाश यांना मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर अविनाश जाधव यांनी दि. ७ सप्टेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.