धाराशिव: “हा निधी काय कणकवलीची प्रॉपर्टी विकून आणलाय का?”… थेट, बोचरा आणि जिव्हारी लागणारा हा सवाल सध्या धाराशिवच्या राजकीय हवेत घुमतोय. सवाल विचारलाय ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आणि तो रोखलाय थेट मंत्री नितेश राणे यांच्या दिशेने. निमित्त आहे, तब्बल २६८ कोटींच्या विकास निधीला ‘फक्त भाजप कार्यकर्त्यांसाठी’ दिलेली स्थगिती आणि राणेंनी स्वतःच दिलेली ‘प्रामाणिक’ कबुली! “बरे झाले, स्थगिती का दिली हे स्वतःच कबूल केले. आता जनताच निवडणुकीत तुमचा हिशोब चुकता करेल,” अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला.
धाराशिव जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची आणि इतर विकासाची २६८ कोटींची कामे जिल्हा नियोजन समितीने मंजूर केली होती. मात्र, या कामांना अचानक स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती का दिली, यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर, भाजप मेळाव्यात बोलताना नितेश राणे यांनी या स्थगितीमागे ‘भाजप कार्यकर्त्यांवरील अन्याय’ हे कारण असल्याचे स्पष्ट केले.
निंबाळकरांचा पलटवार: “सत्तेची मस्ती डोक्यात गेलीये!”
राणे यांच्या या वक्तव्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर चांगलेच संतापले. “हा पैसा सर्वसामान्य नागरिकांनी जीएसटीच्या रूपात भरलेला आहे, कुणाच्या घरातला नाही. सत्तेची मस्ती यांच्या डोक्यात शिरली आहे आणि ही मस्ती कशी जिरवायची हे जनतेला चांगलं माहीत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
एवढ्यावरच न थांबता, “तलावातील मासे गोळा करण्याचे कंत्राट सुद्धा भाजप कार्यकर्त्यांच्या संस्थेला द्या, असे आदेश मंत्री महोदय देत आहेत. हा देश संविधानाने चालतो की नाही, असा प्रश्न पडतोय. ही लोकशाहीची थट्टा आणि खून आहे,” असे म्हणत निंबाळकरांनी राणेंच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
“तुमची किरकिर रोज करणार!”
“शिवसेनेचे खासदार, आमदार जास्त किरकिर करत असतील तर मला बोलवा,” या राणेंच्या इशाऱ्यावर बोलताना निंबाळकर अधिकच आक्रमक झाले. “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करा, हे बोलणे जर तुम्हाला किरकिर वाटत असेल, तर होय… आम्ही ही किरकिर रोज करणार!” असे आव्हानच त्यांनी दिले.
“कोकणातून विमानाने येण्यापेक्षा धाराशिवमध्येच घर करा!”
शेवटी, “सरकारी पैशाने कोकणातून विमानाने येऊन-जाऊन करण्यापेक्षा धाराशिवमध्येच एक घर करून राहा,” असा उपरोधिक टोला लगावत ओमराजे निंबाळकर यांनी या वादाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.
एकंदरीत, राणेंच्या एका वक्तव्याने धाराशिवच्या राजकारणात मोठी आग लागली असून, विकासकामांच्या स्थगितीवरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक टीकाटिप्पणी आणि थेट आव्हानांपर्यंत पोहोचला आहे. या राजकीय ‘सामन्या’त पुढे काय होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.