उमरगा: येथील नारंगवाडीमध्ये आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून दोन गटांमध्ये सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध दिलेल्या तक्रारींवरून उमरगा पोलीस ठाण्यात एकूण दहा जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नारंगवाडी येथील संध्या बारसमोर घडली.
पहिल्या घटनेत, फिर्यादी अभिमन्यू उर्फ पिंटू रामराव जाधव (वय ४८, रा. नारंगवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विजय कोंडीबा शेळके (रा. नारंगवाडी), मुक्ताजी भोसले, सदानंद साठे, अमोल साठे आणि दयानंद साठे (सर्व रा. मातोळा, ता. औसा) यांनी आर्थिक वादातून गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी विजय शेळके यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
त्याचवेळी, दुसऱ्या गटाचे विजय कोंडीबा शेळके (वय ४१, रा. नारंगवाडी) यांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी अभिमन्यू रामराव जाधव, कृष्णा जाधव, सुधीर प्रभाकर जाधव, सागर दगडू जाधव आणि सदाशिव आष्टे (सर्व रा. नारंगवाडी) यांनी संगनमत करून त्यांना आर्थिक व्यवहारातून शिवीगाळ केली. तसेच, काठी, दगड आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
दोन्ही गटांनी २ ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून, उमरगा पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२),(३), १८९(२), १९१(२),(३), आणि १९० अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. एकाच घटनेत दोन्ही गटांवर गुन्हे दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.