धाराशिव – खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून, अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’चं अधिकृत नामकरण ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’ असं करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भारतीय रेल्वे विभागाने यास अधिकृत मान्यता दिली आहे.ही केवळ नावाची अदलाबदल नाही, तर धाराशिवच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा दैदिप्यमान विजय आहे, अशा शब्दांत ओमराजेंनी या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार ” उस्मानाबाद ” या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “धाराशिव” असे करण्यास केंद्र सरकारकडून पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. गृह मंत्रालयाच्या दिनांक २ डिसेंबर २०२४ च्या पत्रानुसार, या नाव बदलाच्या प्रस्तावावर भारतीय सर्वेक्षण विभागाची टिप्पणी मागवण्यात आली होती. यानंतर देखील उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे धाराशिव असे नामांतर करण्याबाबत संथ गतीने प्रक्रिया सुरू होती. या अनुषंगाने खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी सह बैठक घेऊन सदर स्थानकाचे नाव धाराशिव असे नामांतरित करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करणे बाबत सूचित केले होते तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री मा.ना.श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडून पत्राव्दारे पाठपुरावा केला होता. त्यानुसार केंद्र शासनाने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नामांतर धाराशिव असे करण्यास मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे धाराशिव या प्राचीन ऐतिहासिक शहराला पारंपरिक ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिक नागरिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे.
धाराशिवचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व अधोरेखित करत गेल्या काही वर्षांपासून ‘धाराशिव’ हे नाव बहाल करण्याची मागणी होत होती. विशेषतः ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने यासाठी आवाज उठवला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून, स्थानिक जनतेतही या निर्णयाचं जोरदार स्वागत होत आहे.
रेल्वे स्थानकावर लवकरच नव्या नावाचे फलक झळकणार असून, विविध प्रशासकीय स्तरावर आवश्यक ती अद्ययावत प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.