धाराशिव: “तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची माहिती भाजप आमदार राणा पाटील यांना वर्षभरापूर्वीच मिळाली होती, पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी त्यांनी ही माहिती दाबून ठेवली आणि ड्रग्ज माफियांना पाठीशी घातले,” असा सणसणीत आणि थेट आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. आमदार कैलास पाटील यांना सोबत घेऊन घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून आमदार राणा पाटील आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नांची सरबत्ती केली.
खासदार निंबाळकर यांनी अत्यंत आक्रमकपणे सांगितले की, “आमदार राणा पाटील यांचा कार्यकर्ता विनोद गंगणे हा ड्रग्जच्या आहारी गेल्याने त्याला डिसेंबर २०२३ मध्येच राणा पाटलांनी स्वतःच्या तेरणा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. म्हणजे त्यांना या प्रकरणाची पूर्ण कल्पना होती. मग गुन्हा दाखल होण्यासाठी १४ फेब्रुवारी २०२५ का उजाडावे लागले? एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ही माहिती तात्काळ पोलिसांना का दिली नाही? वर्षभर ते गप्प का होते?”
“मी लोकसभेत आणि आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला, पण ज्यांच्या मतदारसंघात हे गंभीर प्रकरण घडले, ते आमदार राणा पाटील विधानसभेत गप्प का बसले? आता प्रकरण बाहेर आल्यावर पोलिसांना टीप दिल्याचे सांगत आहेत. मग वर्षभर कुणाला वाचवत होते?” असा बोचरा सवाल निंबाळकर यांनी उपस्थित केला.
पोलिसांवरही गंभीर आरोप; ‘आका’ कोण वाचवतंय?
खासदार निंबाळकर यांनी पोलिसांच्या तपासावरही गंभीर ताशेरे ओढले. ते म्हणाले, “या प्रकरणात ३७ आरोपी निष्पन्न झाले, पण दोन महिने उलटूनही केवळ १९ जणांना अटक झाली आहे. १८ आरोपी आजही मोकाट आहेत. मुंबईची आरोपी संगीता गोळे हिने तिच्या जबाबात ‘अग्रवाल’ नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे. त्याचा फोन चालू असूनही पोलीस त्याला अटक का करत नाहीत? पिटा सुर्वे यालाही अटक झालेली नाही. हे दोघे या रॅकेटचे ‘आका’ असून त्यांना नेमके कोण वाचवत आहे?”
“एवढेच नाही, तर संगीता गोळेचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला नवरा वैभव गोळे याला अटक करूनही का सोडण्यात आले? दोन लाख रुपयांचे ड्रग्ज खरेदी करणाऱ्या विनोद गंगणेला विक्रेता न दाखवता केवळ सेवन करणारा म्हणून का दाखवले? या सर्व प्रकरणावरून पोलीस मोठ्या राजकीय दबावाखाली काम करत आहेत हे स्पष्ट होते,” असेही ते म्हणाले.
या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन लवकरच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेमुळे धाराशिवच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
एका व्यक्तीसाठी पोलिसांचा ‘द्रविडी प्राणायाम’
पोलिसांनी एका व्यक्तीला वाचवण्यासाठी संपूर्ण तपास भरकटवला असल्याचा दावा करताना निंबाळकर म्हणाले, “विनोद गंगणे याला केवळ ‘सेवन’ गटात टाकले आहे. पण याच गंगणेने एकावेळी ड्रग्जच्या ८५ पुड्या खरेदी केल्या. त्याने १ लाख ८५ हजार रुपये इतरांच्या मोबाईलवरून ड्रग्ज तस्कर संतोष खोतला पाठवले. दुसऱ्याच्या नावाचे सिमकार्ड वापरणे, हा शांत डोक्याने केलेला कट नाही का? आरोपी संतोष खोतच्याच जबाबानुसार गंगणेने २ लाख ९७ हजारांचे ड्रग्ज खरेदी केले. मग हा केवळ सेवन करणारा कसा?”
तपासातील धक्कादायक बाबी आणि पोलिसांना सवाल
१. २० पाने गायब: फरार आरोपी बापू कणे याच्या बँक खात्याचे स्टेटमेंट २४ पानांचे असताना पोलिसांनी आरोपपत्रात केवळ ४ पाने जोडली. उर्वरित २० पाने का दडपली? त्यात कोणाचे आर्थिक व्यवहार लपवले आहेत?
२. ‘आकां’ना अभय: मुंबईचा तस्कर अतुल अग्रवाल आणि सोलापूरचा पिट्या सुर्वे यांची नावे समोर येऊनही पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. अग्रवालचा फोन चालू असतानाही त्याची साधी चौकशीही नाही.
३. मुख्य गुन्हेगाराला पळायला मदत?: आरोपी संगीता गोळे हिला अटक केल्याची माहिती पोलिसांनी तिचा पती वैभव गोळे याला दिली. वैभव गोळे हा स्वतः दोन ड्रग्ज प्रकरणात आरोपी असून, माहिती मिळताच तो फरार झाला. पोलिसांनी मुख्य गुन्हेगारालाच पळून जाण्यास मदत केली का?
४. पोलीस कर्मचारीच सामील?: आरोपींच्या जबाबात काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा पोलिसांना बडतर्फ करण्याचे आश्वासन दिले होते, पण इथे साधी चौकशीही सुरू नाही.
‘संपत्ती जप्त करा, कोर्टातील भूमिकेवर लक्ष’
“फरार आरोपींना अटक झाल्यानंतरच ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. या सर्वांवर मकोको लावावा, त्यांची आणि ड्रग्जमधून कमावलेली संपत्ती जप्त करावी,” अशी मागणी खासदार निंबाळकर यांनी केली. “पोलीस आरोपींना जामिनासाठी न्यायालयात मदत करत आहेत का, यावर आमचे बारीक लक्ष आहे. तसे आढळल्यास थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू. हे ड्रग्ज रॅकेट मुळापासून नष्ट झालेच पाहिजे,” असा इशाराही त्यांनी दिला.