तुळजापूर: शेताच्या बांधावरील पोल काढून आमच्या शेतात का रोवला, या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून दोघा भावांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अपसिंगा (ता. तुळजापूर) येथे घडलेल्या या घटनेत तलवारीचा वापर करण्यात आला असून, फिर्यादीच्या आईलाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत नामदेव डुकरे (वय ४२, रा. अपसिंगा) हे फिर्यादी आहेत. ही घटना ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास कात्री-अपसिंगा रोडवर घडली.
आरोपी नारायण निवृत्ती काळे, शंभू नारायण काळे आणि सुष्मा नारायण काळे (सर्व रा. अपसिंगा) यांनी फिर्यादी हनुमंत डुकरे यांना गाठून, “बांधावरील पोल काढून तो आमच्या शेतात का रोवला?” असा जाब विचारत शिवीगाळ सुरू केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी डुकरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच तलवारीने वार करून गंभीर जखमी केले.
भांडण सोडवण्यासाठी आलेले फिर्यादीचे भाऊ प्रकाश नामदेव डुकरे यांच्याही डाव्या हातावर मारून त्यांना जखमी करण्यात आले. तसेच फिर्यादीच्या आईला जोरात ढकलून दिले. यावेळी आरोपींनी “तुम्हाला जिवे ठार मारू,” अशी धमकी दिली.
या घटनेनंतर औषधोपचार घेऊन हनुमंत डुकरे यांनी १० डिसेंबर २०२५ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), (३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






