तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र शहराला आता गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) निलेश देशमुख यांच्या कार्यकाळात तुळजापूर शहराची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, शहराचे अक्षरशः ‘बिहार’ झाले आहे. दिवसाढवळ्या होणारे गोळीबार, गावठी कट्ट्यांचा मुक्त संचार आणि राजरोसपणे चालणाऱ्या अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली आहेत.
२१ वर्षीय तरुणाकडे सापडला गावठी कट्टा अन् जिवंत काडतूस (ताजी घटना)
शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी ताजी घटना २७ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. तुळजापूर येथील हडको मैदान परिसरात रात्री पावणे दहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने कारवाई करत एका २१ वर्षीय तरुणाला गावठी कट्ट्यासह बेड्या ठोकल्या आहेत.
-
आरोपीचे नाव: विनोद ऊर्फ लाल्या बंडू हुच्चे-गवळी (वय २१, रा. आर्या चौक, तुळजापूर).
-
जप्त मुद्देमाल: या आरोपीकडून २५ हजार रुपये किमतीचा एक लोखंडी गावठी कट्टा, ५०० रुपयांचे एक जिवंत काडतूस (K.F. 7.65) आणि २ लाख ३५ हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड हंटर बुलेट (MH 25 BD 0407) असा एकूण २ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार बळीराम शिंदे यांच्या तक्रारीवरून झाली आहे. त्यामुळे तुळजापूरचे स्थानिक पोलीस नेमके काय करत आहेत, हा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे.
गुन्हेगारीचा आलेख: तीन महिन्यांत तीनदा हवेत गोळीबार
गेल्या केवळ तीन महिन्यांचा आढावा घेतल्यास पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे स्पष्ट होते:
-
डिसेंबरचा थरार: डिसेंबर महिन्यात काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांच्या घरावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. त्यांचे पुतणे कुलदीप मगर यांना कोयत्याने बेदम मारहाण करण्यात आली आणि दहशत माजवण्यासाठी हवेत गोळीबारही झाला.
-
फेब्रुवारीतील सलग घटना: फेब्रुवारी महिन्यातच हवेत गोळीबाराच्या दोन घटना घडल्या आहेत. धाराशिव रोडवरील एका हॉटेलसमोर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच, आता हडको मैदानात तरुणाकडे गावठी कट्टा सापडल्याने खळबळ उडाली आहे.
सत्ताधारी भाजप नगरसेविकेलाही द्यावे लागले निवेदन
एकीकडे शहरात शस्त्रास्त्रांचा नंगा नाच सुरू असताना, दुसरीकडे दारू, मटका, जुगार आणि वेश्या व्यवसाय तेजीत सुरू आहेत. पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नसल्याची उघड चर्चा शहरात आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, खुद्द सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका प्रियंका विजय गंगणे यांना या अवैध धंद्यांविरोधात निवेदन देऊन अधिकृत तक्रार करावी लागली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष का?
पोलीस अधीक्षक या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून तुळजापूरकरांना गुंडांच्या दहशतीतून मुक्त करणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.






