महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत सध्या भक्तीचा गजर नव्हे, तर गुंडगिरीचे तांडव सुरू आहे. तुळजापुरात भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला रक्तरंजित राडा, भररस्त्यात तलवारींचा खणखणाट आणि झालेला गोळीबार हे केवळ दोन गटांतील भांडण नाही; तर ही तुळजापुरात फोफावलेल्या राजकीय गुंडगिरीची आणि ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेची साक्ष आहे. विशेषतः या प्रकरणात भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या राजकीय आश्रयाखाली पोसलेले गुंडच शहरात ही दहशत माजवत आहेत, असा सूर आता सर्वसामान्यांतून उमटत आहे.
गोलाई चौकात जे घडले, ते लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे, पण त्याआधीच सत्तेत असलेल्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभवाच्या भीतीपोटी आणि सत्तेची मस्ती डोक्यात गेल्यानेच विरोधकांवर जीवघेणे हल्ले करण्याचे षडयंत्र रचले जात आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. पिंटू गंगणे सारखे कार्यकर्ते जर थेट गोळीबार आणि तलवारी काढण्यापर्यंत मजल मारत असतील, तर त्यांना कोणाचे पाठबळ आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हे धाडस राजकीय ‘गॉडफादर’च्या आशीर्वादाशिवाय होऊच शकत नाही.
तुळजापुरात गेल्या काही दिवसांपासून केवळ राजकीय मारामारीच नव्हे, तर अवैध धंदे आणि ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट वाढला आहे. तरुण पिढीला नशेच्या आणि गुन्हेगारीच्या गर्तेत ढकलून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा हा प्रकार संतापजनक आहे. शहरात इतके मोठे ड्रग्ज रॅकेट सापडते, गुंड तलवारी घेऊन नाचतात, तरीही पोलीस निष्क्रिय का? पोलिसांची ही बघ्याची भूमिका संशयास्पद आहे. जेव्हा गुंड आमदार आणि नेत्यांचे ‘कार्यकर्ते’ म्हणून मिरवतात, तेव्हा खाकी वर्दीचा वचक आपोआपच संपतो, आणि आज तुळजापुरात नेमके तेच घडत आहे.
निवडणुका येतात आणि जातात, पण सत्तेसाठी तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्राचे रणांगण करणे कितपत योग्य आहे? राणा पाटलांनी कितीही विकासकामांच्या गप्पा मारल्या, तरी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होणारा हा हिंसाचार त्या विकासाचा बुरखा फाडणारा आहे. ज्यांची पायाखालची वाळू सरकली आहे, तेच आता दहशतीचा आधार घेत आहेत, हे जनतेला कळून चुकले आहे.
प्रशासनाला आणि पोलिसांना आमचा एकच सवाल आहे – तुम्ही कायद्याचे रक्षण करणार आहात की राजकीय गुंडांचे चाकर होणार आहात? तुळजापूरच्या जनतेने या गुंडगिरीला वेळीच ठेचले पाहिजे. कारण आज जर या प्रवृत्तीला रोखले नाही, तर उद्या सामान्य माणसाला घराबाहेर पडणेही मुश्कील होईल. आई तुळजाभवानीच्या दरबारात अशी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, हे ‘पोसलेल्या गुंडांनी’ आणि त्यांच्या ‘मालकांनी’ लक्षात ठेवावे!
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह







