तुळजापूर– तालुक्यातील तुळजापूर खुर्द येथे शेत जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ५४ वर्षीय व्यक्तीला चाकू आणि दगडाने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयाजी बाजीराव जगदाळे (वय ५४, रा. तुळजापूर खुर्द) असे जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी शहाजी नेताजी जगदाळे (रा. तुळजापूर खुर्द) याने ४ जुलै २०२५ रोजी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास शेत वाटणीच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी, चाकू व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले.
एवढ्यावरच न थांबता, आरोपीने फिर्यादी जयाजी जगदाळे यांचे नातेवाईक वर्षाराणी गणेश कदम आणि रेखा अमोल सुरवसे यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेप्रकरणी जयाजी जगदाळे यांनी ७ जुलै रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शहाजी जगदाळे याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११८(१), ३५२, ११५(२), आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.