महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी… जिच्या एका दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक ऊन-तान्हाची पर्वा न करता, अनवाणी पायांनी तुळजापुरात दाखल होतात. श्रद्धेने नतमस्तक होणाऱ्या या निरागस भाविकांना आणि विशेषतः महिलांना ज्यावेळी पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांचा प्रसाद मिळतो, तेव्हा ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचा अक्षरशः खून झालेला असतो. चैत्र पौर्णिमेच्या पवित्र दिवशी तुळजापुरात जे घडले, तो केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर राजकीय साठमारीत गुंड प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या अमर्याद सत्तेचा माज आहे. डीवायएसपी नीलेश देशमुख यांनी भाविकांना केलेली अमानुष मारहाण ही खाकी वर्दीला लागलेली मोठी काळीमा आहे.
रक्षक की भक्षक?
पार्किंगसारख्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद सामोपचाराने सोडवणे हे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे काम असते. मात्र, डीवायएसपी नीलेश देशमुख यांनी तिथे सिंघम स्टाईल ‘एन्ट्री’ मारत थेट कायदा हातात घेतला आणि भाविकांना रस्त्यावर बेदम बदडण्यास सुरुवात केली. या हुकूमशाहीत महिला भाविकांनाही सोडले नाही, त्यांनाही अत्यंत वाईट पद्धतीने धक्काबुक्की करण्यात आली. याचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगाचा तीळपापड झाल्याशिवाय राहत नाही. देवदर्शनाला आलेल्या भक्तांवर हात उचलण्याची हिंमत या अधिकाऱ्यामध्ये येते कुठून?
गुन्हेगारांपुढे नांगी आणि भाविकांवर दादागिरी!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार कैलास पाटील यांनी या मुद्द्यावर थेट आणि अत्यंत अचूक बोट ठेवले आहे. पोलिसांची ही तथाकथित ‘मर्दानगी’ फक्त सामान्य माणसांपुरतीच मर्यादित का? जो पोलीस अधिकारी निरपराध महिलांवर हात उगारतो, तोच अधिकारी खऱ्या गुन्हेगारांसमोर मात्र शेपूट घालतो, हे वास्तव आहे. एका खळबळजनक प्रकरणाचा दाखला देत आमदार पाटील यांनी पोलिसांचे वाभाडे काढले आहेत. ड्रग्ज आणि गुटखा तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यातील एक आरोपी तब्बल १३ महिने पोलिसांना गुंगारा देतो आणि तोच आरोपी चक्क पोलीस ठाण्यात येऊन जप्त केलेला माल सोडवण्यासाठी पोलिसांनाच दमदाटी करतो! त्यावेळी या नीलेश देशमुखांचा सिंघम कुठे जातो? तुळजापुरात तीन वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या तेव्हा हा देशमुखी थाट कुठे मावळला होता ? गुन्हेगारांसमोर गुडघे टेकणारी पोलीस यंत्रणा भाविकांवर मात्र ‘खाकीचा माज’ दाखवत असेल, तर गृहखात्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
देशमुखांच्या मुजोरीमागे कुणाचा आशीर्वाद?
कोणताही अधिकारी एवढा मुजोर तेव्हाच होतो, जेव्हा त्याला राजकीय नेत्यांचे अभय असते. डीवायएसपी नीलेश देशमुख यांच्या या हुकूमशाही प्रवृत्तीचे मूळ स्थानिक राजकारणात दडलेले आहे. या अधिकाऱ्याची दोन वर्षांची मुदत केव्हाच संपलेली आहे. तरीही, स्थानिक भाजप आमदार राणा पाटील यांच्या विशेष आशीर्वादाने त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ कशासाठी? जनतेच्या संरक्षणासाठी की अवैध धंद्यांना संरक्षण देण्यासाठी?
आज तुळजापूर, नळदुर्ग आणि तामलवाडी परिसरामध्ये अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. हे सर्व व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने फोफावत आहेत, हे लपून राहिलेले नाही. तुळजापूरच्या ज्या ड्रग्ज प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला, त्यातील अनेक संशयितांना पाठीशी घालण्याचे आणि त्यांना अभय देण्याचे ‘पुण्यकर्म’ याच अधिकाऱ्याने केल्याची उघड चर्चा आहे.
सत्याचा आवाज दाबण्यासाठी खोट्या गुन्ह्यांचे हत्यार
या भ्रष्ट व्यवस्थेचा सर्वात भयानक पैलू म्हणजे, जो कोणी या अन्यायाविरुद्ध, अवैध धंद्यांविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो, त्याचा आवाज कायमचा दाबण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जातो. आपल्या मुजोरीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार आणि सुजाण नागरिकांवर सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करण्याची एक भयंकर प्रथा या भागात रुढ झाली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना अशा प्रकारे खोट्या केसेसमध्ये अडकवून, गुंडांच्या मदतीने दहशत माजवून जर कोणी स्वतःला ‘तुळजापूरचा राजा’ समजत असेल, तर हा भ्रम लवकरच दूर करण्याची गरज आहे. स्वतः त्यांच्या हाताखाली काम करणारे पोलीस कर्मचारीही या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळले असून, अनेक जण त्यांच्यासोबत काम करण्यास नकार देत आहेत.
कारवाई निलंबनाचीच हवी!
आता प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. सामान्य भाविकांवर लाठीचार्ज करणारा, महिलांना धक्काबुक्की करणारा, अवैध धंद्यांना खतपाणी घालणारा आणि पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणारा असा वादग्रस्त आणि भ्रष्ट अधिकारी तुमच्या पोलिसांच्या प्रतिमेत बसतो का?
आमदार कैलास पाटील आणि संतप्त भाविकांनी केलेली डीवायएसपी नीलेश देशमुख यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी ही अत्यंत रास्त आहे. या प्रकरणाची केवळ बदली करून बोळवण होता कामा नये. देशमुखांचे तात्काळ निलंबन करून, त्यांच्या कार्यकाळातील सर्व अवैध धंदे, ड्रग्ज प्रकरणातील त्यांचे लागेबांधे आणि त्यांनी पत्रकारांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. अन्यथा, आई तुळजाभवानीच्या दरबारात न्याय मागणारी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही!
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह




