तुळजापूर-रस्त्यावर गाड्या लावू नका, येण्या-जाण्यास अडथळा होतो, असे म्हटल्याच्या कारणावरून हंगरगा तुळ (ता. तुळजापूर) येथे एका कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील सहा सदस्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी दत्ता मुरलीधर देशमुख (वय ४०, रा. हंगरगा तुळपाटी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ६ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:१५ च्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादीने आरोपींना “रस्त्यावर गाड्या लावू नका, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो,” असे सांगितले. याच गोष्टीचा राग धरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून वाद घालण्यास सुरुवात केली.
आरोपींनी फिर्यादी दत्ता देशमुख यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, विटांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले. इतकेच नव्हे तर, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नीला आणि बहिणीलाही आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच “पुन्हा आडवे आलात तर जिवे ठार मारू,” अशी धमकीही यावेळी देण्यात आली.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
दत्ता देशमुख यांनी ९ मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
१. अमोल विजय लोंढे
२. महेश विजय लोंढे
३. विजय बोधला लोंढे
४. बाई विजय लोंढे
५. राधा महेश लोंढे
(सर्व राहणार: हंगरगा तुळपाटी, ता. तुळजापूर)
या प्रकरणाचा अधिक तपास तुळजापूर पोलीस करत असून, भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(१), १९१(२) आणि १९१(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.






