तुळजापूर: स्वतःच्या वरिष्ठांनाच ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार तुळजापूरमध्ये उघडकीस आला आहे. तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याकडे तक्रार मागे घेण्यासाठी १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी त्यांचेच सहकारी मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल आणि वकील बालाजी बोडके यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तहसीलदार अरविंद शंकरराव बोळंगे (वय ४३) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तहसीलदार बोळंगे हे तुळजापूर येथे कार्यरत असून, त्यांच्या अंतर्गत आरळी बु. येथे मंडळ अधिकारी म्हणून दिनेश बहिरमल हे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.


दिनेश बहिरमल यांनी एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले होते, ज्याची सुमारे ४ लाख रुपये थकबाकी होती. बँकेच्या वसुलीसाठी येणाऱ्या फोन कॉल्ससाठी बहिरमल यांनी ‘कार्यालय प्रमुख’ म्हणून तहसीलदार बोळंगे यांचा मोबाईल नंबर दिला होता. विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू असताना बँकेच्या वसुली विभागाकडून तहसीलदारांना वारंवार फोन येऊ लागले. याबाबत तहसीलदारांनी बहिरमल यांना फोन करून जाब विचारला असता, बहिरमल यांनी उलट त्यांच्या विरोधात आनंदनगर (धाराशिव) पोलीस ठाण्यात शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली.
आनंदनगर पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी दिनेश बहिरमल आणि त्यांचे वकील बालाजी बोडके (रा. ढोकी) यांनी तहसीलदार बोळंगे यांच्याकडे पैशांची मागणी सुरू केली.
-
सुरुवातीला प्रकरण मिटवण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
-
त्यानंतर तडजोड म्हणून १० लाख रुपये आणि माफीनाम्याची मागणी केली.
-
शेवटी माफीनामा नाही दिला तरी चालेल, पण २ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे करण्यात आली.
घरी येऊन बँक खाते क्रमांक दिला
दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १:३० च्या सुमारास आरोपी दिनेश बहिरमल आणि वकील बालाजी बोडके हे तहसीलदार बोळंगे यांच्या तुळजापूर येथील घरी गेले. तिथे त्यांनी पैसे पाठवण्यासाठी शहाजी अभिमान कांबळे (रा. ढोकी) यांच्या बँक खात्याचा तपशील व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि पैसे दिल्यास पुन्हा त्रास होणार नाही, असे सांगितले.
या सततच्या मानसिक त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल आणि ॲड. बालाजी बोडके यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(३) (खंडणी) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कांबळे करीत आहेत.
नेमके काय आहे प्रकरण?
अंक १: तहसीलदारांवर शिवीगाळीचा गुन्हा – या प्रकरणाची सुरुवात १८ नोव्हेंबर रोजी झाली. आरळी बु. येथील मंडळ अधिकारी दिनेश वैजनाथ बहिरमल यांनी २०२० मध्ये क्रेडिट कार्डवर कर्ज घेतले होते, त्याचे हप्ते थकल्याने बँकेच्या वसुली प्रतिनिधीने ‘कार्यालय प्रमुख’ म्हणून तहसीलदार अरविंद बोळंगे यांना वारंवार फोन करून त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तहसीलदार बोळंगे यांनी बहिरमल यांना फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, असा आरोप करत बहिरमल यांनी धाराशिवच्या आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून मंगळवारी (दि. ९) आनंदनगर पोलिसांत तहसीलदारांवर अदखलपात्र गुन्हा (NC) दाखल करण्यात आला असून, या वादाच्या पार्श्वभूमीवर मंडळ अधिकारी बहिरमल यांची तडकाफडकी जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे.
अंक २: तहसीलदारांचा ‘प्रतिडाव’ – खंडणीचा गुन्हा दाखल आनंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेली ही तक्रार मागे घेण्यासाठी आता आपल्यालाच ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी केला आहे.
महसूल विभागात खळबळ
एका मंडळ अधिकाऱ्याने चक्क आपल्याच तहसीलदारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून खंडणी मागितल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.






