तुळजापूर – येथील खटकाळ गल्ली, शुक्रवार पेठ परिसरात गल्लीत येण्याच्या किरकोळ कारणावरून एका ४४ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच चाकुने मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत संबंधित व्यक्ती जखमी झाला असून, त्याला जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना ११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ‘टि मेडिकल’ जवळील फिर्यादीच्या चहा नाष्टा हॉटेलसमोर खटकाळ गल्ली, तुळजापूर येथे घडली. या प्रकरणी लक्ष्मीनारायण उर्फ नितीन नागनाथ कनकधर (वय ४४ वर्षे, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी भवानीशंकर नागनाथ कनकधर, शभांगी भवानीशंकर कनकधर, श्वेतांबरी भवानीशंकर कनकधर आणि समर्थ भवानीशंकर कनकधर (सर्व रा. खटकाळ गल्ली, शुक्रवार पेठ, तुळजापूर) यांनी नितीन कनकधर यांना ‘गल्लीत का येतोस’ असे विचारून शिवीगाळ केली. यानंतर आरोपींनी नितीन कनकधर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच चाकुनेही त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. यावेळी आरोपींनी त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
लक्ष्मीनारायण उर्फ नितीन कनकधर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलिसांनी २२ एप्रिल २०२५ रोजी वरील चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता च्या नमूद कलमांन्वये (118(1), 115(2), 351(3), 3(5) अन्वये) गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.