उमरगा – उमरगा तालुक्यात शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाने आणि विजांच्या कडकडाटाने मोठे नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीत वीज कोसळून एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एका बैलालाही आपला जीव गमवावा लागला. तालुक्यात अनेक ठिकाणी वित्तहानी झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बोरी येथील रहिवासी अमोल संतराम मदने (वय ३५) यांचा शुक्रवारी दुपारी वीज पडून मृत्यू झाला. अमोल हे आपल्या शेतात खत पसरण्याचे काम करत होते. अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाल्याने ते काम लवकर संपवण्याच्या तयारीत असतानाच अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अमोल हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते, त्यांच्या निधनामुळे मदने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, तालुक्यातील पेठसांगवी येथील राम सुभेदार यांची गाय तसेच एकुर्गा येथील राम सरवदे यांच्या मालकीचा एक बैल दगावला आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शुक्रवारी झालेल्या या अवकाळी पावसाचा फटका उमरगा तालुक्यातील एकुर्गा, बेटजवळगा, मैंदर्गी, टाकळी, बोरी, जकेकूरवाडी अशा अनेक गावांना बसला. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा जोरदार कडकडाट झाला. जकेकूरवाडी येथे नानाराव सूर्यवंशी यांच्या शेतातील एका झाडावर वीज पडल्याने ते झाड पूर्णपणे जळून गेले. तसेच, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडांचे आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.