धाराशिव: वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांनी सेरेंटीका आणि रिनिवल पॉवर या कंपन्यांवर आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे, पवनचक्की आणि उच्चदाब वीजवाहिनीच्या कामासाठी ठरलेला मोबदला न दिल्याने, या शेतकऱ्यांनी २५ जून २०२५ पासून वाशी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
तांदुळवाडी शिवारात सेरेंटीका आणि रिनिवल पॉवर कंपन्यांनी पवनचक्की उभारणी आणि २२० केव्ही क्षमतेच्या वीजवाहिन्या टाकण्याचे काम केले आहे. पीडित शेतकऱ्यांनी वाशी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही कामे करताना कंपन्यांनी जमिनीचा योग्य मोबदला दिलेला नाही. २२० केव्ही टॉवरसाठी प्रति टॉवर १७ लाख रुपये आणि तारांखालील जागेसाठी प्रति मीटर २२,००० रुपये मोबदला देण्याचे ठरले होते, मात्र ही रक्कम अद्याप मिळालेली नाही.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, कंपन्यांनी बळजबरीने आणि तुटपुंजी रक्कम देऊन कामे करून घेतली आहेत. गावातील काही दलाल आणि गुंड प्रवृत्तीचे लोक शेतकऱ्यांना धमकावून जमिनीच्या कागदपत्रांवर सह्या घेत आहेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, कंपन्यांनी परिसरातील फळझाडे आणि इतर झाडांची विनापरवानगी मोठ्या प्रमाणात कत्तल केली आहे. काही वीजवाहिन्या इराचीवाडी तलावाच्या पाण्यातूनही गेल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून ठरल्याप्रमाणे प्रति टॉवर १७ लाख रुपये आणि तारांखालील जमिनीसाठी प्रति मीटर २२,००० रुपये प्रमाणे मोबदला त्वरित देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास, रमेश अंकुश गाढवे, मधुकांत शिवाजी चौधरी यांच्यासह अनेक शेतकरी २५ जूनपासून उपोषणाला बसणार आहेत.
या निवेदनाच्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि स्थानिक खासदार व आमदारांसह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.