धाराशिव: जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) यांच्या कडक आदेशानंतरही तुळजापूर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अखेर आज कार्यमुक्त (Relieve) करण्यात आले आहे. ‘धाराशिव लाईव्ह‘ने १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती, ज्याचा थेट परिणाम आज पाहायला मिळाला.
काय होते प्रकरण?
काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बदली होऊनही नवीन ठिकाणी हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कान उपटले होते. मात्र, तुळजापूर पोलीस ठाण्यातील काही ‘खास’ कर्मचारी बदली होऊन वर्ष उलटले तरी जुन्याच खुर्चीला चिटकून होते. यावर ‘धाराशिव लाईव्ह’ने “SP मॅडमच्या फर्मानाला केराची टोपली? तुळजापूरच्या ‘त्या’ गुटखा वसूलदारावर साहेबांचा वरदहस्त कायम?” या मथळ्याखाली सडेतोड बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीमुळे पोलीस वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली होती.
अखेर आज बजावला ‘बिनतारी संदेश’
‘धाराशिव लाईव्ह’च्या बातमीची दखल घेत वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली. आज, ५ मार्च २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी अधिकृत पत्र (बिनतारी संदेश) काढून खालील दोन कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त केले आहे:
१. पोलीस हवालदार (ब.नं. १५६०) जी. टी. माळी: यांची तुळजापूर येथून उमरगा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.
२. पोलीस अंमलदार (ब.नं. १७१७) ए. एस. पवार: यांची तुळजापूर येथून तामलवाडी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.
या दोन्ही कर्मचाऱ्यांना आज दुपारी ४:५१ वाजता तुळजापूर पोलीस ठाण्यातून सोडण्यात आले असून, त्यांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी वेळेत हजर होण्याचे कडक समज देण्यात आले आहेत.
वसुली बहाद्दरांचे धाबे दणाणले
जुन्या केसेसचे आणि तपासाचे ‘गोंडस’ कारण पुढे करून बदली टाळणाऱ्या या कर्मचाऱ्यांमागे नक्की कोणाचा वरदहस्त होता, याची चर्चा अद्यापही पोलीस दलात सुरू आहे. मात्र, ‘धाराशिव लाईव्ह’च्या दणक्यामुळे आता शिस्त पाळली जात असल्याचे चित्र दिसत आहे. बदलीच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचेही आता धाबे दणाणले आहेत.
“प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि शिस्त असायलाच हवी. बदली होऊनही न जाणाऱ्यांवर झालेली ही कारवाई म्हणजे चुकीच्या प्रवृत्तींना मिळालेला इशारा आहे.” — नागरिकांमधील प्रतिक्रिया.
आमच्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी ‘धाराशिव लाईव्ह’ला फॉलो करा.






