धाराशिव – कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयीपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या ४२ गोवंशीय वासरांना जीवदान देण्यात धाराशिव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी येडशी टोल नाक्यावर सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, वासरांसह पिकअप वाहन असा एकूण २ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बुधवारी, ११ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येडशी टोल नाक्यावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी एमएच ४२ बी ४२०३ या क्रमांकाच्या संशयित पिकअप वाहनाला थांबवून तपासणी केली. वाहनाच्या मागच्या डालात अत्यंत निर्दयीपणे, चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता ४२ जर्सी गायीची वासरे कोंबून भरल्याचे पोलिसांना आढळून आले.
पोलिसांनी तात्काळ वाहनचालक सलमान असलम सय्यद (वय २७, रा. शहाजी नगर, बारामती रोड, इंदापूर, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता, ही वासरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे उघड झाले.
याप्रकरणी पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपी सलमान सय्यद विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. सर्व ४२ वासरांची सुटका करण्यात आली असून, पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.