धाराशिव: धाराशिव जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर यांनी आज अखेर पदभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या अवघ्या नऊ महिन्यांतील तडकाफडकी बदलीनंतर त्यांच्या जागी श्रीमती खोकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाधव सध्या नव्या पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत.
संजय जाधव यांनी १४ ऑगस्ट २०२४ रोजी धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. मात्र, अवघ्या नऊ महिन्यांत त्यांची बदली झाली. विशेषतः तुळजापूर येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलीस दलासमोर होते आणि या प्रकरणी अद्यापही काही प्रमुख आरोपी फरार आहेत. जाधव यांच्या बदलीमागे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील तपासातील कथित अपयश असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.


गंमत म्हणजे, जाधव यांची बदली झाल्यानंतर आणि खोकर मॅडम रुजू होण्यापूर्वी पोलीस मुख्यालयात बदल्यांचा ‘अंतिम सामना’ सुरू झाल्याची कुजबुज होती. जाधव यांनी जाता जाता पोलीस कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल यांच्या बदल्यांची प्रक्रिया वेगाने सुरू केली होती. या बदल्या नियमानुसार नसून, आर्थिक ‘देवाणघेवाण’ करून होत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली होती, ज्याला ‘बदलीचा बाजार’ असेही संबोधले जात होते.धाराशिव लाइव्हच्या बातमीनंतर या बदल्यांना ब्रेक लागला आहे.
नूतन पोलीस अधीक्षक रितू खोकर ह्या भारतीय पोलीस सेवेतील २०१८ च्या तुकडीमधील पोलीस अधिकारी आहेत. त्या मूळच्या हरियाणा राज्यातील पानिपत येथील असून त्यांचे वडील गावचे सरपंच होते. श्रीमती खोकर यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठामधून एम.एस्सी. (गणित) विषयात सुवर्णपदक पटकावले आहे. यापूर्वी त्या सांगली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या आणि त्याआधी त्यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणूनही काम पाहिलेले आहे.
धाराशिवला काही दिवसांपूर्वीच अपर पोलीस अधीक्षक म्हणून शफकत आमना यांची नियुक्ती झाली होती. आता पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर यांची नियुक्ती झाल्याने धाराशिव पोलीस दलात महिला अधिकाऱ्यांचा दबदबा वाढला आहे.
नूतन पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासमोर आता धाराशिव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे, प्रलंबित मोठ्या गुन्ह्यांचा तपास मार्गी लावण्याचे, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींना गजाआड करण्याचे तसेच अवैध धंद्यांना पूर्णपणे आळा घालण्याचे प्रमुख आव्हान असणार आहे. त्यांच्या अनुभवाचा जिल्ह्याला कसा फायदा होतो आणि त्या या ‘बदलीच्या बाजारा’सारख्या चर्चांना कसा आळा घालतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.